विद्यार्थ्यांनी आजार लपवू नये : डॉ. आबिदी

0

पुणे । खाण्याच्या चांगल्या सवयी, व्यायाम आणि आनंदी राहण्याकडे कल ठेवावा, आजार, नैराश्य कधीही लपवू नये, असा सल्ला कॅनडास्थित फिजिशियन डॉ. सय्यद तकी आबिदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर आयोजित ‘विद्यार्थ्यांसाठी शारीरीक, मानसिक आरोग्याचे महत्त्व’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

आझम कॅम्पसमधील ‘हायटेक’ हॉलमध्ये हे व्याख्यान झाले. यावेळी आबेदा इनामदार, मुनव्वर पीरभॉय, डॉ. मुश्ताक मुकादम, डॉ. जालिस अहमद, डॉ.नझिम शेख उपस्थित होते. डॉ. आबिदी म्हणाले, पौगांडावस्थेत शरीरातील अंतस्थ ग्रंथींच्या स्रवाच्या चढ-उतारामुळे (हार्मोनल इम्बॅलन्स) विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या आयुष्यात, आरोग्यात बदल घडतात; ते लक्षात येत नाहीत. अशावेळी हार्मोन्स, थायरॉईड, हिमोग्लोबिन तपासून उपचार घेतले पाहिजे. कोणतीही छोटी आरोग्यविषयक समस्या दुर्लक्षित करू नये. विद्यार्थिनींनी हार्मोनल इम्बॅलन्सवर उपचार केले नाहीत तर पुढे जननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी खाण्यामध्ये हे आवडत नाही ते खात नाही, असा दृष्टिकोण बाळगू नये. विद्यार्थिनींमध्ये खाण्याच्या आवडी-निवडीमुळे हिमोग्लाबिन कमतरतेची समस्या निर्माण होते.

मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी स्वतःच्या आहे त्या व्यक्तिमत्वावर समाधानी असले पाहिजे. अनावश्यक स्पर्धा टाळावी, नैराश्य येत असेल तर वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत. रात्री जागरण करू नये. अभ्यासासाठी झोप न येण्याच्या गोळ्या घेऊ नयेत. विद्यार्थ्यांनी दर 2 वर्षांनी तपासण्या करून त्याची नोंद ठेवण्याची सवय लावून घेतली पाहिजे. पुढील आयुष्यात या नोंदी उपयोगी ठरतात. पाण्याची बाटली सोबत ठेवण्याची साधी सवयही उपयुक्त ठरते.