विविध मागण्यांसाठी शेतकरी धडकणार विधानभवनावर

0

मुंबई । शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने निर्णायक लढा द्यायचे ठरवले असून सभेने उद्या (6 मार्च) नाशिक ते मुंबई अशालाँग मार्चचे आयोजन केले आहे. विधानसभा अधिवेशन काळात आयोजित करण्यात आलेल्या या लाँगमार्चमध्ये राज्यभरातून सुमारे एक लाख शेतकरी सहभागी होतील असा दावा सभेने केला आहे. नाशिक येथून मुंबईपर्यंत पायी चालत येणारे हे शेतकरी अधिवेशन सुरू असताना विधानसभेला बेमुदत महाघेराव घालणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हा बेमुदत घेराव सुरूच राहील, असे किसान सभेने जाहीर केले आहे.

सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. ते खचून जाऊन आत्महत्या करत आहेत. शेतकर्‍यांवर कोसळलेल्या या संकटाच्या काळात सरकार मात्र शेतकर्‍यांच्या मागे उभे राहण्याऐवजी फसव्या घोषणा करत आहे. म्हणूनच शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतरही आत्महत्या करत आहेत. कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यात तब्बल 1753 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत, असे म्हणत किसान सभेने शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी पुन्हा एकदा आरपार लढा लढण्याचा निर्णय घेतला आहे.