वीज निर्मिती केंद्रांच्या परिसरात जैव विविधता उद्यानांची निर्मिती करणार

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचा निर्णय

 

 

जळगाव – प्रदूषण तसेच अन्य पर्यावरणीय समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून पारससह राज्यातील सर्व वीज निर्मिती केंद्राच्या परिसरात जैवविविधता उद्याने उभारण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून प्रस्ताव पाठवावेत,असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले.
पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे डॉ.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अकोला आणि वाशीम या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील औष्णिक, जल,वायू आणि सौर ऊर्जा प्रकल्पात भविष्यात जैवविविधता उद्याने उभारली जाणार आहेत.
या बैठकीस महावितरणचे अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, महापारेषणचे अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता बी.टी. राऊत, महानिर्मितीचे पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खटारे तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत अकोला, बुलडाणा,वाशीम या जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. निर्मिती,पारेषण, वितरण आणि महाऊर्जा या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. वीजनिर्मिती प्रकल्पांच्या परिसरात प्रदूषण व अन्य पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजना म्हणून जैवविविधता उद्यानांची निर्मिती करावी. त्यासाठी पर्यावरण शास्त्र तज्ज्ञाकडून प्रकल्प अहवाल तयार करून घ्यावा. वीजनिर्मितीदरम्यान उत्सर्जन होणाऱ्या रासायनिक घटकांचे स्वरूप व प्रमाण लक्षात घेऊन त्यास अनुकूल अशा वनस्पतींची लागवड करण्यात यावी. वृक्षलागवड तसेच सौर ऊर्जेचा वापर या बाबींचा समावेश त्यात करून जैवविविधता उद्यान व सौर ऊर्जा प्रकल्प एकत्र उभारता येईल का, याची चाचपणी करावी,अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. सविस्तर प्रकल्प अहवालासह या विषयावर प्रस्ताव पाठवावा,असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कर्मचारी वसाहतींच्या परिसरात कर्मचाऱ्यांची मुले-मुली यांच्यासाठी अद्ययावत ग्रंथालय उभारावे. त्यात विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी.

थकबाकी वसुलीसाठी बांधावर जा
वीज निर्मितीसाठी आवश्यक कोळशाची उपलब्धता ठेवण्याबाबत दक्ष रहावे, असेही त्यांनी सांगितले. महावितरणने थकबाकी वसुलीसाठी गावोगावी जाऊन शेतकरी तसेच अन्य ग्राहकांना विविध योजनांचे स्वरूप समजावून सांगावे, अशी महत्वपूर्ण सूचना त्यांनी केली. यात उत्कृष्ट प्रचार-प्रसाराचे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, असेही डॉ.राऊत यांनी स्पष्ट केले. महापारेषणने उन्हाळ्याच्या काळात ज्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो, अशा तांत्रिक कारणांची माहिती अद्ययावत करून ठेवावी, जेणेकरून आपत्तीच्या काळात उपाययोजना करता येणे शक्य होईल. त्यानंतर त्यांनी रोहित्र क्षमता वाढ,उपकेंद्र उभारणी,रिऍक्टर उभारणी आदी बाबींचा आढावा घेतला.

अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
राज्यातील महानिर्मिती, महापारेषण, महावितरणच्या अधिकाऱ्यांना आपले ज्ञान अद्ययावत करता यावे यासाठीही त्यांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.

योजनांची व्याप्ती वाढविण्याचे सूतोवाच
अनुसूचित जाती, जमातीच्या ग्राहकांसाठी असणाऱ्या डॉ.आंबेडकर जीवन प्रकाश योजनेची व्याप्ती ओबीसी घटकांसाठी वाढविणार असल्याचे तसेच वसंतराव नाईक कृषी वीज जोडणी योजनेलाही मुदतवाढ देणार असल्याचे सूतोवाच डॉ. राऊत यांनी केले.