जळगाव : तालुक्यातील कुवारखेडा गावातील 19 वर्षीय तरुणाचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात तीव्र संताप व्यक्त केला. ज्ञानेश्वर सुभाष पाटील (19, कुवारखेडा) असे मयत तरुणाचे नाव आहे.
फवारणीसाठी आल्यानंतर दुर्घटना
वडिलांना शेतात फवारणी करण्यास मदत करण्यासाठी ज्ञानेश्वर सुभाष पाटील हा तरुण शेतात आला असता फवारणीसाठी पाण्याची टाकी भरायची असल्याने तो शेतातील ट्युबवेल सुरू करण्यासाठी गेला असता वीज खांबावरील वीज प्रवाह (करंट) ट्यूबवेलमध्ये उतरल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शेतात काम करणार्यांच्या लक्षात येताच त्यांनी ज्ञानेश्वरला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी करीत त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्या, मयत ज्ञानेश्वर या तरुणाने शुक्रवारी सकाळीच जळगावच्या नूतन मराठा विद्यालयात कॉमर्स शाखेत द्वितीय वर्षासाठी प्रवेश निश्चित केला होता मात्र क्रुर काळाने त्याच्यावर झडप घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.
चार बहिणीचा एकूलता एक भाऊ
शॉक लागून मृत्यू झालेला ज्ञानेश्वर हा चार बहिणींचा एकूलता एक भाऊ होता. त्याचा अकाली दुर्दैवी मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या कुटूंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला.