शहादा । आठ व्यापार्याचे परवाने रद्द केल्यानंतर हरभरासह इतर धान्याची खरेदी विक्री बंद झाल्याने आज तिसर्या दिवशी बाजार समिती आवारात शुकशुकाट होता. जवळपास सर्व व्यापार्यांची दुकाने बंद होती. शेतकर्यांच्या माल आता घरीच पडुन राहिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. बाहेरील कोणतेही व्यापारी अद्याप धान्याचा खरेदी विक्रीसाठी आलेले नाहीत तसा त्यांचा प्रतिसाद नसल्याचे दिसुन आले. बाहेरच्या व्यापार्यांनी परवाने रद्द झालेल्या व्यापार्यांना समर्थन दिल्याचे समजते. आधीच बस्तान मांडुन बसलेल्या व्यापार्यांची हमालसह मजुरांची साखळी असल्याने बाहेरचा व्यापार्यांना हमाल मिळणार नाही.
घेतलेला माल घेवुन ठेवणार कुठे सह अनेक प्रश्न आहेत. सध्यातरी पंधरा दिवसापेक्षा जास्त कालावधी व्यापार्याचा खरेदी विक्री पुर्ववत होण्यास लागेल अशी माहिती मिळाली. शासकीय गोदामात गेल्या वर्षीचा 27 हजार क्विंटल तुर भरुन पडलेला आहे. शासकीय गोदामे , कोल्ड स्टोरेज भरुन पडल्याने शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचा माल नवापुर येथील गोदामात ठेवलेला आहे. परवाने रद्द करण्यात आलेले आठही व्यापार्यांवरच बाजार समितीतील धान्य खरेदी विक्रीचा व्यवहार चालतो. त्यामुळे शहादा तालुक्यातील शेतकर्यांचे व शहरतील बाजार पेठेचे आर्थिक चक्र मंदावणार आहे