शहरात रोडरोमियोंचा उच्छाद वाढला!

0

पिंपरी-चिंचवड (बापू जगदाळे) : गेल्या अनेक दिवसांपासून उद्योगनगरीत रोडरोमियोंचा उच्छाद वाढला आहे. रोडरोमियोंच्या हिरोगिरीमुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थिनी, महिलांचा विनयभंग करण्यापर्यंत रोडरोमियोंची मजल पोहोचली आहे. रोडरोमियोंची प्रचंड दहशत असल्याने भीतीपोटी पालक तसेच विद्यार्थिनी तक्रार करण्यास धजावत नाहीत. तक्रार केली तर आपले शिक्षण किंवा नोकरी बंद होईल, या भीतीखाली विद्यार्थिनी, युवती निमूटपणे हा त्रास सहन करत असल्याने रोडरोमियोंना चांगलेच रान मोकळे झाले आहे. असे असताना पोलीस प्रशासनाने मात्र, डोळ्यावर पट्टी बांधली आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

शाळा, महाविद्यालय परिसर त्रास
एका दुचाकीवर ट्रिपलसीट बसून जोरजोरात कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, विद्यार्थिनींचे लक्ष आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करणे, भरधाव वाहन चालवत मुलींना कट मारणे, मुलींना पाहून अश्‍लिल हावभाव करणे, असे प्रकार शहरात ठिकठिकाणी पाहावयास मिळतात. विविध शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात हमखास हे चित्र दिसते. नोकरीनिमित्त एमआयडीसीत जाणार्‍या महिला व मुलींची संख्या अधिक आहेत. महिला किंवा मुली बस थांब्यावर, रस्त्यावर येताच रोडरोमियो हिरोगिरी दाखवत असतात. विद्यार्थिनी रस्त्यावरून पायी चालत असताना रोडरोमियो दुचाकीवरून मागून येतात व छेड काढतात.

तक्रारी वाट पाहतात पोलीस
रोमियोगिरी करणारे तरुणही अगदी सोळा ते एकोणीस वयोगटातील असून, हिरोगिरी करण्याच्या नादात आपण काहीतरी गुन्हा करतोय याची जाणीव त्यांनाही नसल्याचे दिसून येते. अशा प्रकारच्या कृत्यांवर वेळीच प्रतिबंध घातला जात नसल्याने त्यांचे धाडस वाढत आहे. प्रसंगी विनयभंग, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हेही घडतांना दिसून येत आहे. असे प्रकार थांबविण्यासाठी पोलिसांबरोबरच महाविद्यालय प्रशासन, शिक्षकांची ही जबाबदारी असून पालकांनीदेखील आपल्या मुलांच्या वागणुकीकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. दरम्यान, शहरातील भोसरी, पिंपरी, मोशी, आळंदी रस्ता, दिघी, चिखली, कुदळवाडी, आकुर्डी, निगडी, मोहननगर, इंद्रायणीनगर, चिंचवड आदी भागातील शाळा, महाविद्यालय परिसरात हे प्रकार घडत असून, यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे. केवळ तक्रार येण्याची वाट पाहण्यापेक्षा पोलिसांनी स्वत:च लक्ष पुरवायला हवे, असाही सूर पालकवर्गातून उमटत आहे.

अनेकांच्या पुढील शिक्षणास अडथळा
शहरात अनेक कुटुंब राज्याच्या व देशाच्या कानाकोपर्‍यातून रोजगारानिमित्त शहरात आले आहेत. यामध्ये अनेकजण कष्टकरीवर्गात मोडत असून, त्यांची घरची परिस्थिती ही बेताचीच असते. तरीदेखील आपल्या मुलीने शिकले पाहिजे, यासाठी उच्चशिक्षणापर्यंत मुलींना शिकवण्याचा पालकांचा प्रयत्न असतो. याची जाणीव असलेल्या मुलींना महाविद्यालयात येताना-जाताना अशा रोडरोमियोंकडून त्रास झाला तरी; आपले शिक्षण बंद होईल, या भीतीने त्या याबाबत तक्रार करत नाहीत. असा प्रकार घरी समजल्यास पालक भीतीपोटी आपल्या मुलीचे पुढील शिक्षण बंद करतात किंवा मुलीच्या विवाहाची तयारी करतात. यामुळे इच्छा असूनही मुलींना पुढे शिक्षण घेता येत नाही. ही फार मोठी शोकांतिका होऊन बसली आहे.

रोमियोंना राजकीय बळ
चांगल्या वेशात सुशिक्षित पेहरावात राहून रोमियोगिरी करणारे भरपूर आहेत. केवळ सभ्य दिसण्यामुळे त्यांच्याकडे बोट करता येत नाही. अशांवर संशयही घेता येत नाही. तर कारवाई दूरच राहिली. बस, लोकल यामध्ये हे रोमियो अगदी बिनधास्त चाळे करत असतात. अशा रोमियोंना स्थानिक पुढार्‍यांचेदेखील पाठबळ मिळत असल्यामुळे त्यांना कोणत्याही घटकांची भीती राहिलेली नाही.

याला पोलीस कितपत जबाबदार
सध्या पोलीस यंत्रणेकडून कोणत्याही स्वरुपाची कारवाई होत नसल्याने रोडरोमियोंचे फावले आहे. रोमियोगिरी करणार्‍यांना पाठिशी घालण्याचे काम केले जात असल्याचा आरोप होत आहे. जोपर्यंत तक्रार येत नाही; तोपर्यंत कोणतीही कार्यवाही करायची नाही, अशी मानसिकता पोलीस अधिकार्‍यांची झालेली आहे. तक्रारीची वाट पाहण्यापेक्षा शाळा, महाविद्यालय तसेच कंपन्यांभोवती गस्त वाढवावी, अशी मागणी पालकवर्गाकडून होत आहे.