शहादा– एस.टी. बसची झाली “माल वाहतूक ट्रक”*
असलोद प्रतीनिधी:~राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळाने २३ मार्चपासून राज्यातील सर्व प्रवाशी वाहतूक थांबवली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पुन्हा राज्य परिवहन महामंडळाने २२ मे पासून जिल्हा अंतर्गत प्रवाशी वाहतूक सुरु केली आहे. परंतु राज्यभरात शाळा, महाविद्यालये आणि विवाह सोहळे साजरे करण्यावर बंदी कायम असलेल्यामुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शहादा आगाराने काही दिवसांनंतर एसटी महामंडळाने आता प्रवाशी वाहतुकीबरोबरच शेतीमालाची वाहतूक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवाशी वाहतूक बंद असल्यामुळे राज्यभरातील शेकडो बस जागेवरच थांबून आहेत. वाहक व चालकही घरीच आहेत. अशा परिस्थितीमध्ये एसटीचा तोटा कमी करण्यासाठी काही प्रमाणात प्रवाशी वाहतूक सुरु केली. पण प्रवाशी वाहतुकीला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने राज्यातील बहुतांश आगारांना तोटाच सहन करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाने तोटा कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची सोय करण्यासाठी शेतीमालाची वाहतूक बाजारपेठेपर्यंत करण्याचा निर्णय घेतल आहे.
कोरोना व्हायरस रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे दैनंदिन जीवनासह उद्योग धंद्यांमध्ये लक्षणीय बदल होत आहेत. वर्षानुवर्षे प्रवाशांची सेवा करणारे एसटी महामंडळही त्यास अपवाद राहिलेले नाही. प्रवाशी वाहतूक जवळपास ठप्प झाली असल्याने उत्पन्न मिळविण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता माल वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे.