पिंपरी चिंचवड : ऐतिहासिक काळात दृक-श्राव्य माध्यमांची कोणतीही साधने उपलब्ध नसताना खरा इतिहास जिवंत ठेवण्याचे काम शाहिरांनी केल्याचे मत ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ यांनी पिंपरी येथे व्यक्त केले. पिंपरीगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शाहीर परिषद, पुणे जिल्हा शाखेच्या वतीने भव्य शाहिरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्या महोत्सवांतर्गत पिंपरीगावात अखिल शिवजयंती उत्सव समिती, पिंपरीगाव आयोजित शाहिरी शिववंदना या कार्यक्रमात प्रभाकर ओव्हाळ बोलत होते. यावेळी, नगरसेवक संदीप वाघेरे, नगरसेविका उषा वाघेरे, नगरसेविका अश्विनी बोबडे, स्वागताध्यक्ष भीमा बोबडे, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे कार्यवाह शाहीर प्रकाश ढवळे आणि उपाध्यक्ष बाळासाहेब काळजे उपस्थित होते.
विविध विषयांवर पोवाड्यांचे सादरीकरण…
ओव्हाळ पुढे म्हणाले की, लोककलेत शाहिरीचा सहभाग खूप मोठा आहे. प्रतापगडाच्या रणसंग्रामात प्रत्यक्षदर्शी असलेल्या अज्ञानदासाने जिजाऊ माँसाहेबांच्या आज्ञेनुसार छत्तीस कवनांच्या पोवाड्यातून शौर्याचा इतिहास कथन केला. त्या वेळेपासून निर्माण झालेली शाहिरी परंपरा आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे.
हे देखील वाचा
कार्यक्रमाच्या प्रारंभी समर्थ रामदास स्वामी रचित शिववंदनेचे सामुदायिक पठन करीत सर्व उपस्थितांनी शिवस्मारकावर पुष्पवृष्टी करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. ढोलकी आणि हार्मोनियम वादन करणार्या राजाभाऊ गायकवाड, हेरंब चिंचणीकर, अर्जुन नेटके, उद्धव गुरव, उल्हास पिलवळकर यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. पोवाड्यांच्या कार्यक्रमात बालशाहीर प्रथमेश थोरात, हृषीकेश मोतीवाले, प्रीतम, मकरंद यांनी स्त्रीभ्रूणहत्या, पर्यावरण, महाराष्ट्रवर्णन, अफजलखान वध अशा विविध विषयांवरील पोवाड्यांचे प्रभावी सादरीकरण केले.
रसिकांची उत्स्फुर्त दाद…
शाहीर बाळासाहेब काळजे यांनी आपल्या पहाडी आवाजातून सादर केलेल्या सिंहगडाच्या पोवाड्याने श्रोत्यांना वीरश्रीचा प्रत्यय दिला. शाहीर प्रकाश ढवळे यांनी अभ्यासपूर्ण निवेदन करीत गणवंदना, मुजरा, शिवबांचे कवन सादर करून वातावरण भारून टाकले. अतिशय रंगतदार झालेल्या पोवाड्यांच्या या सत्राचा समारोप शाहिरा अलका जोशी आणि महिला शाहिरांनी सादर केलेल्या शिवराज्याभिषेकगीताने केला. मंत्रमुग्ध झालेल्या रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत बालशाहिरांवर रोख बक्षिसांची खैरात केली. शाहीर प्रकाश ढवळे यांनी प्रास्ताविक केले. शीतल कापशीकर यांनी सूत्रसंचालन केले. संतोष गोलांडे, राजेंद्र आहेर, वनिता मोहिते, प्रचिती भिष्णुरकर, काशिनाथ दीक्षित, दीपक कुलकर्णी यांनी संयोजनात परिश्रम घेतले.