शुभेच्छा फलकांच्या भाऊगर्दीने शहराचे विद्रुपीकरण

0

भुसावळ पालिकेकडून धडक कारवाईची अपेक्षा : शहरातील ‘त्या’ भाईंनी वाढदिवसाचे हटवले फलक

भुसावळ ः शहरात सर्वदूर लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून हे फलक हटवण्याची मागणी आहे तर काही फलक लावण्यासाठी परवानगीच घेतली नसल्याची बाब पुढे आली आहे. पालिकेकडूनही या फलक लावणार्‍यांवर कारवाई होत नसल्याने नागरीकांमधून तीव्र नराजी व्यक्त होत आहे तर पालिकेचे आर्थिक नुकसानदेखील होत आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी या संदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, भुसावळातील शांतता समितीच्या बैठकीत भाईंच्या पोस्टरची चर्चा झाल्यानंतर ‘ते’ फलक आता हटवण्यात आले आहेत.

अनधिकृत फलकांचा बोलबाला
भुसावळ शहरातील जामनेर रोड, यावल रोड तसेच शहरातील विविध भागात पालिकेच्या खांबावर तसेच मिळेल त्या जागेवर विविध जाहिरातदार तसेच नेत्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलक लावण्यात आले आहे. फलक लावल्यानंतर अनेक दिवस हे फलक कायम असल्याने वाहनधारकांचे यामुळे लक्ष विचलीत होवून अपघात घडण्याची भीतीदेखील वर्तवली जात आहे. कारवाई करण्याची जवाबदारी पालिकेची असताना यंत्रणा मात्र सुस्त आहे. या संदर्भात पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी पालिकेला या फलकांबाबत पत्र देणार असल्याचे ते म्हणाले.

मोकाट गुरांची डोकेदुखी
शहरातील जामनेर रस्त्यावर तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर मोकाट गुरांनी ठिय्या मांडल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. पालिका प्रशासनाने या गुरांच्या मालकांवर आता गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता आहे. गणेशोत्सवाचे दिवस असल्याने भाविक दर्शनासाठी बाहेर पडतात मात्र या मोकाट गुरांमुळे अप्रिय घटना घडण्याची भीती आहे.

मुख्याधिकारी म्हणाल्या कारवाई करणार
मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, अनधिकृत फलकांबाबत माहिती घेवून निश्‍चित कारवाई करू तसेच मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.