शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणाराच देशावर राज्य करू शकेल – राजू शेट्टी

0

नवी दिल्ली : ‘देशामधील पुढील निवडणुका या शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर लढल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणाराच यापुढं देशावर राज्य करू शकणार आहे,’ असं सांगत २०१९मध्ये देशाचा पुढचा पंतप्रधान शेतकरीच असेल,’ असा ठाम विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा यांसह विविध मागण्यांसाठी देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीत आज रामलीला मैदान ते संसद असा विराट मोर्चा काढला. सकाळी दहाच्या सुमारास निघालेला हा मोर्चा पावणेबाराच्या सुमारास संसद मार्गावर पोहोचला. तिथं या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. यावेळी शेतकरी नेत्यांनी सभेला संबोधित केलं.

शेतकऱ्यांसाठी विशेष अधिवेशन बोलवा

राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना मोदी सरकारवर निशाना साधला. ‘हा मोर्चा म्हणजे सरकारला दिलेला अल्टिमेटम आहे. सध्याच्या शेतकरी धोरणामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. जीएसटीसाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं गेलं. त्यासाठी दोन्ही सभागृहांनी एकत्र येऊन मध्यरात्री जीएसटीला मंजुरी दिली. जे जीएसटीसाठी केलं जातं, ते शेतकऱ्यांसाठी का होऊ शकत नाही, असा सवाल करत,’ शेतकऱ्यांसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली.

पंजाब, बिहार, तामीळनाडू येथून आलेल्या शेतकरी नेत्यांनीही आपल्या प्रादेशिक समस्या मांडल्या. भाजप सरकारनं दिशाभूल केल्याची भावनाही व्यक्त करण्यात आली. या मोर्च्याला दिल्लीकरांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला. दिल्लीतील कलाकार, पत्रकार, विद्यार्थी व अभियंते मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते.