पुणे : राज्यात यंदा दुष्काळ आहे, मराठवाड्यात एक मूठ धान्य आणि एक पेंडी चारा प्रत्येकाने दिला तर मराठवाड्यातील जनावरांना आणि माणसांना हातभार लागेल. दिल्लीत शेतकरी मोर्चा निघाला. हे पाहता शेतकऱ्यांना संस्थांनी मदत करावी. कोणतेही सरकार मदत करते मात्र ती कमी पडते तेव्हा सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन मदत करायला हवी असे आवाहन अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.
राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग आणि ग्रीन थंब या संस्थेच्या माध्यमातून खडकवासला बॅकवॉटरमधील गाळ साफ करण्याच्या चौथ्या टप्प्याचे आज अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते हे उदघाटन करण्यात आले. यावेळी नाम फाऊंडेशनकडून पाच पोकलन या उपक्रमासाठी देण्यात आले.
नाना पाटेकर यांना आपल्याकडे राम मंदिरावर चर्चा होते, मात्र दुष्काळावर चर्चा होत नाही असा प्रश्न विचारला असता, नानांनी त्याला सडेतोड उत्तर दिले. कुणी काय करायचे हे त्यांच्यावर आहे. मला जे करावेसे वाटते ते मी करतो. गरीब माणसाच्या तोंडात रोज दोन घास गेले तर ते मला देवळात गेल्यासारखेच वाटेल. त्यामुळे तुम्हाला मंदिर बांधयाचे असेल तर बांधा. पण मला जे काम करायचे आहे मी करत आहे असेही नाना पाटेकर म्हणाले.