नवी दिल्ली – शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचे पॅकेज देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. शेतकर्यांसाठी गेल्या दोन महिन्यांत राबविण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती ही त्यांनी दिली. लॉकडाउनच्या काळात ७४ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची धान्य खरेदी करण्यात आली. ५६० लाख लीटर दुधाचे संकलन करण्यात आले. देशातल्या २ कोटी शेतकर्यांना व्याजावर सबसिडी देण्यात आली आहे. दूध उत्पादकांना लॉकडाउनच्या काळात ४ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम दिल्याचंही स्पष्ट करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. यात कोणत्या क्षेत्राला काय मिळाले याच्या घोषणा तीन दिवस करण्यात येत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेचा आजचा तिसरा दिवस होता. शेती आणि कृषी उद्योगासाठी महत्त्वाची घोषणा केल्या.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या महत्त्वाच्या घोषणा
१) औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी ४ हजार कोटींची मदत
२) पशुपालन आणि दुग्ध व्यवसायसाठी १५ हजार कोटींची तरतूद
३) पाळीव प्राण्यांच्या लसीकरणासाठी १३ हजार ३४३ कोटींची तरतूद
४) मत्स्य व्यवसायासाठी २० हजार कोटींची तरतूद
५) अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १० हजार कोटींची तरतूद
६) मधमाशी पालन व्यवसायासाठी ५०० कोटींची तरतूद
७) भाजीपाला वाहतुकीवर ५० टक्के सबसिडी