शेवट अटळ

0

विश्‍व हिंदू परिषदेचे फायरब्रँड नेते प्रवीण तोगडिया यांना कधी काळी याच संघटनेतून बाहेर जावे लागेल, असे कुणी स्वप्नातही विचार करू शकत नव्हते. तथापि, अलीकडच्या घटना पाहता त्यांना विहिंपमध्ये कोणतेही स्थान उरले नसून, ते आता कोणता पर्याय निवडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही महिन्यांपासून तोगडिया यांनी जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेल्या ड्रामेबाजीमुळे त्यांची ही दुर्गती होणार हे केव्हाच स्पष्ट झाले होते. यावर फक्त आता श्‍निकामोर्तब होणार आहे.

जानेवारी महिन्याच्या मध्यावर अचानक तोगडिया हे त्यांच्या राहत्या घरून गायब झाल्याचे वृत्त वार्‍यासारखे पसरताच प्रचंड खळबळ उडाली होती. अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये राहणार्‍या तोगडिया यांचे अपहरण तर झाले नाही ना? अशी शंका उपस्थित झाली. अनेकांनी त्यांचा घातपात झाल्याचा संशयदेखील व्यक्त केला. मात्र, काही तासांनंतर तोगडिया यांचा शोध लागला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली. हे प्रकरण आहे तरी काय? याबाबत तर्क-वितर्क लावले जात असतानाच खुद्द प्रवीण तोगडिया हे जगासमोर अवतरले.

व्हीलचेअरवर बसून आणि अगदी हाताला सलाइन लावलेल्या अवस्थेत त्यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली. यात तोगडिया यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली. त्यांनी अगदी अश्रूभरल्या डोळ्यांनी गुजरात व राजस्थान सरकारसह केंद्र सरकार आपल्या विरुद्ध असल्याचा आरोप केला. अगदी आपल्या एन्काउंटरची तयारी असल्याचा गौप्यस्फोटदेखील त्यांनी केला. अर्थात तोगडियांच्या आरोपांनी प्रचंड खळबळ उडाली. ऐन गुजरात निवडणुकीआधीच तोगडियांच्या या आरोपांनी संघ परिवार आणि अर्थातच सत्ताधारी भारतीय जनता पक्षात अस्वस्थतेचे वातावरण पसरले. त्यांनी या पत्रकार परिषदेत थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर शरसंधान केल्यानेही आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने राम मंदिराच्या आश्‍वासनाची पूर्तता केली नसल्यापासून ते शेतकर्‍यांविरोधात असल्याच्या आरोपांच्या अनेक फैरी त्यांनी झाडल्या. मुळातच या निवडणुकीत भाजपच्या तोंडाला फेस आला होता. विरोधकांच्या एकजुटीमुळे भाजपला अगदी निसटता विजय मिळाला. यामुळे अर्थातच तोगडिया यांना चेव सुटला. ते नंतरदेखील पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात बोलू लागले. मध्यंतरी त्यांनी आपल्या कारचा अपघात करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाला. तथापि, आधीच्या ड्रामेबाजीमुळे त्यांच्या या आरोपाकडे प्रसारमाध्यमांनी फारसे लक्ष दिले नाही.

गेल्या काही दिवसांपासून तर तोगडिया हे कुणाच्या खिजगणतीत नसल्याचे दिसून येत होते. या पार्श्‍वभूमीवर, विश्‍व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तोगडियांचे उमेदवार राघव रेड्डी यांचा पराभव करून विष्णू सदाशिव कोकजे यांनी विजय मिळवल्यामुळे पुन्हा एकदा प्रवीण तोगडिया चर्चेत आले. विश्‍व हिंदू परिषदेच्या स्थापनेनंतर अशोक सिंघल आणि प्रवीण तोगडिया या दोन्ही मान्यवरांनी या संघटनेला वलय मिळवून दिले. सिंघल यांनी नव्वदच्या दशकातील धुमसत्या वातावरणात विहिंपची आक्रमक भूमिका जोरकसपणे मांडली, तर याच्या खालोखाल प्रवीण तोगडिया यांनीही आपल्या ज्वालाग्रही वक्तव्यांच्या माध्यमातून संघ आणि पर्यायाने भाजपला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करणारी भूमिका घेतली. अत्यंत प्रभावी व्नतृत्व असणार्‍या तोगडिया यांना यामुळे देशातच नव्हे, तर विदेशातही मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. विहिंपच नव्हे तर संपूर्ण संघ परिवारात तोगडियांचा एक ‘कल्ट’ तयार झाला. विशेष करून अशोक सिंघल यांच्या 2011 साली झालेल्या निधनानंतर विहिंपवरील तोगडियांची पकड अतिशय मजबूत झाली. यानंतर 2014 साली केंद्रात भाजपने धमाकेदार विजय संपादन केला, तर यानंतर देशभरात या पक्षाचा विजयरथ अविरतपणे सुरू झाला. एकीकडे भारतीय जनता पक्ष यशाच्या पायर्‍या झपाट्याने चढत असताना दुसरीकडे तोगडिया यांचा आवाज क्षीण होत गेला. यूपीएच्या 10 वर्षांच्या कालखंडात सरकार हे हिंदूविरोधी असल्याची लोकप्रिय थिअरी मांडणे हे त्यांना सोपे होते. मात्र, देशात भाजपला निर्णायक सत्ता असताना खळबळजनक वक्तव्यांनी जगाचे लक्ष वेधून घेणे हे त्यांच्यासाठी अशक्य झाले. अधूनमधून त्यांनी राम मंदिराचा राग आळवला तरी याकडे कुणी फारसे लक्ष दिले नाही. यातच मोदी व शहा या जोडगोळीने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. हे सारे होत असताना विहिंपवर आपला एकछत्री अंमल असावा असे मनसुबे तोगडियांनी व्यक्त केले. याकडेही संघ परिवाराने गांभीर्याने पाहिले नाही. परिणामी, पहिल्या टप्प्यात नाटकबाजी तर दुसर्‍या टप्प्यात लोकशाहीवादी निवडणुकीच्या माध्यमातून प्रवीण तोगडिया यांनी पूर्ण जोर लावून पाहिला. तथापि, अशा प्रकारच्या आव्हानाला कधीच ओळखून असणार्‍या संघ परिवाराने तोगडियांचा अंमल पूर्णपणे नेस्तनाबूद केला आहे. विश्‍व हिंदू परिषदेचा त्याग केल्यानंतर प्रवीण तोगडिया यांनी पुन्हा एकदा हिंदू हिताचा राग आळवत भविष्यकालीन वाटचालीचे संकेत दिले आहेत. त्यांच्या तोंडून पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिर, काश्मिरातील कलम-370चे निर्मूलन, गोहत्या बंदी आदी संघाचा लोकप्रिय अजेंडा जगासमोर आला आहे.

याच्या जोडीला त्यांनी देशभरातील शेतकर्‍यांच्या हिताची बाबदेखील बोलून दाखवली आहे. मात्र, आधी अत्यंत आत्मविश्‍वासाने बोलणार्‍या प्रवीण तोगडिया यांचे अवसान गळून पडल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. विहिंपने हिंदू हिताचा अजेंडा राबवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली असली तरी संघाच्या मजबूत संघटनाशिवाय त्यांना यश मिळणे दुरापास्त होते. याच पद्धतीने आता तोगडियांनी कितीही आगलावे वक्तव्य केले, तरी त्यांच्या पाठीशी कोणतेही मजबूत संघटन नसल्यामुळे आता त्यांची कोणत्याही प्रकारे दखल घेतली जाणार नसल्याची बाब स्पष्ट आहे. येत्या काही दिवसांमध्ये अहमदाबाद येथे त्यांनी बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मात्र, या आंदोलनाचा फारसा परिणाम होणार नसल्याची बाबदेखील आधीच स्पष्ट झाली आहे. अर्थात वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी विहिंपवर एकछत्री अमल प्रस्थापित करण्याचे प्रवीण तोगडिया यांची आकांक्षा धुळीस मिळाल्याचे दिसून येत आहे. कधीकाळी विहिंप आणि तोगडिया हे समानार्थी शब्द बनले होते. आता याच विहिंपवर टीका करण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. अर्थात हाच काळाने प्रवीण तोगडिया यांच्यावर उगवलेला सूड असेल.