श्यामची आई, श्याम पुरस्कार देणे काळाची गरज – श्रीपाल सबनीस

0
पिंपरी-चिंचवड : आजची पिढी दिशाहीन अवस्थेत भरकटत चालली आहे, आजचा श्याम हा माथेफिरू झाल्याच्या घटना समोर येत असताना या समाजाला दिशा देण्यासाठी श्यामची आई व श्याम पुरस्कार देणे ही पारंपरिक श्रध्दा नव्हे तर ती काळाची गरज बनली आहे असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
वसतकर माता-पुत्रास पुरस्कार
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी यांच्या वतीने तसेच पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी, अखिल भारतीय नाट्य परिषद भोसरी यांच्या सहकार्याने देण्यात येणारे ‘श्यामची आई’ व ‘श्याम’ पुरस्कार यंदा अष्टविनायक ग्रुपचे नागेश वसतकर आणि त्यांच्या मातोश्री कौसल्याबाई वसतकर यांना बुधवारी प्रदान करण्यात आला त्यावेळी सबनीस बोलत होते. यावेळी महापौर राहुल जाधव, आदर्शगाव प्रकल्प योजनाचे अध्यक्ष पोपटराव पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, नारायण सुर्वे अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरीचे अध्यक्ष मुरलीधर साठे आदी उपस्थित होते.
ढवळेश्‍वर, गारगोटे, बडवे सन्मानित
या सोहळ्यात संत साई इंग्लिश मिडीयम स्कूलचे संचालक शिवलिंग ढवळेश्‍वर यांना साने गुरुजी विचार साधना पुरस्कार, डायनॅमिक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संस्थापिका जयश्री गारगोटे आणि श्रीगोंदा तालुक्यातील विद्याधाम प्रशालेचे श्रीराम बडवे यांना साने गुरुजी संस्कारक्षम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले.
यांनी घेतले परिश्रम
प्रास्ताविक सुदाम भोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकुंद आवटे, जयवंत भोसले, बाजीराव सातपुते, हनुमंत देशमुख, राजेंद्र वाघ, रोहित खर्गे, दिलीप वर्मा, सुरेश कंक, अरुण गराडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.