मुंबई : अभिनेता संजय दत्त याचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे. मुंबईतील अंधेरी न्यायालयाने हा आदेश दिला. हे अटक वॉरंट रद्द करण्यासाठी स्वत: संजय दत्त अंधेरी कोर्टात हजर झाला होता.
निर्माता शकील मोरानी यांचा चित्रपट संजय दत्तने अर्ध्यावर सोडला होता. त्याविरोधात मोरानी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र वेळोवेळी आदेश देऊनही संजय दत्त सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाला नव्हता. त्यामुळे अंधेरी न्यायालयाने संजय दत्तच्याविरोधात अटक वॉरंट काढले होते. त्यानंतर आज संजय दत्त कोर्टात हजर झाला. त्यामुळे आता हे अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
2002 साली दिग्दर्शक शकील नुरानी यांनी अभिनेता संजय दत्त याच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. शकील नुरानी हे जान की बाजी नावाचा चित्रपट तयार करत होते. या चित्रपटात संजय दत्त प्रमुख भुमिकेत होता. या चित्रपटासाठी संजय दत्तला शकील नुरानींनी 50 लाख रुपये दिले होते. मात्र, संजय दत्त केवळ दोनच दिवस शुटींगसाठी आला. यामुळे आपले पाच कोटींचे नुकसान झाल्याचा दावा नुरान यांनी केला होता. याप्रकरणी दाद मागण्यासाठी नुरानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने पैसे परत करण्याचे आदेश अभिनेते संजय दत्त याला दिले होते. त्यानंतर संजय दत्तने जो चेक नुरानी यांना दिला होता तो बाउंस झाला.
चेक बाउंस झाल्याने नुरानींनी पुन्हा एकदा न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयाने दोन ते तीन वेळी संजय दत्तला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र कोर्टाच्या आदेशानंतरही तो हजर न राहिल्याने अखेरीस अंधेरी मेट्रोपॉलिटियन मेजेस्ट्रिट कोर्टाने त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते.