पुणे: राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्या मुळे राज्याचा आर्थिक गाडा चालवणे अवघड झाले आहे. राज्याला मिळणाऱ्या महसूलात घट झाल्याने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देणेही सध्या शासनाला अवघड बनले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात त्यांचा पगार देणेही कठीण होईल, त्यासाठी कर्ज काढण्याची वेळ देखील येऊ शकते, अशी चिंता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले, कोरोनामुळे शासनाच्या महसूलात घट झाली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पुढील महिन्यात कर्ज काढावे लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मदत व पुनवर्सन, आरोग्य आणि इतर दोन विभाग वगळता इतर विभागात वेतन कपात करण्याची वेळ आली आहे. मात्र, डॉक्टर, नर्स आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या कोरोना योद्ध्यांचे पगार दिले जाणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.