लखनऊ : भाजपला शह देण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांना एकत्रित करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टीने जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेस आणि भाजपला पर्याय म्हणून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी निर्माण केलेल्या फेडरल फ्रंटला अखिलेश यादव यांनी पाठिंबा दिला असून ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला फार मोठा झटका दिला आहे.
अखिलेश यादव यांनी फेडरल फ्रंट निर्माण केल्याबद्दल हैदराबादला जाऊन के. चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं स्पष्ट केलं. मध्यप्रदेश मध्ये सपाचा एकमेव आमदार निवडून आला आहे. मात्र या आमदाराला मंत्री न बनविल्याने अखिलेश यादव काँग्रेसवर नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी उत्तर प्रदेशात ताकद नसलेल्या काँग्रेसला बळ न देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं. ‘भाजपबरोबर काँग्रेसचेही खूप खूप आभार. मध्यप्रदेशात आमच्या एकमेव आमदाराला तुम्ही मंत्री केलं नाहीत. त्यामुळे आमचा मार्ग आता मोकळा झाला आहे,’ असा निशाना अखिलेश यांनी काँग्रेसवर साधला आहे. तर, ‘समाजवाद्यांना बॅकवर्ड समजल्याबद्दल भाजपचेही आभार,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी २०१९ मध्ये आघाडी निश्चित होईल. देशात महाआघाडी स्थापन करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नांना माझा पाठिंबा आहे. भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, असं अखिलेश म्हणाले. दरम्यान, अखिलेश यादव यांनी चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला पाठिंबा दिल्यानंतर देशात पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी निर्माण झाल्यास भाजपपेक्षाही काँग्रेसला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.