समुद्रात भराव टाकण्यास राष्ट्रवादीचा विरोध

0

मुंबई । मुंबई महापालिकेने प्रारूप विकास आराखड्यात कफ परेड येथील समुद्रात 121 हेक्टर क्षेत्रफळावर मातीचा भराव टाकून सेंट्रल पार्क तयार करण्याचे निश्‍चित केले आहे. मात्र यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होणार असल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसने या नियोजित प्रकल्पाविरोधात आझाद मैदान येथे आंदोलन करून विरोध दर्शवला.

पालिकेच्या या उद्यानासाठी समुद्रात भराव टाकल्याने मुंबईला भविष्यात त्सुनामीच्या धोक्यास सामोरे जाऊ शकण्याची शक्यता असून यामुळे मुंबईकरांच्या जीवास धोका आहे. त्याच प्रमाणे अशा प्रकारे समुद्रात भराव टाकण्यास कोळी बांधवांचाही विरोध असून यामुळे त्यांच्या उपजिविकेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होणार असल्याचे या आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिनभाऊ अहिर आणि पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी सांगितले. सन 2005 रोजी मुंबईत झालेल्या महाप्रलयाने जी वाताहत झाली होती तो प्रसंग अजून मुंबईकर विसरलेले नाहीत. आता तर जरासा पाऊस पडला तरी मुंबई जलमय होते. मग अशा प्रकारे मुंबईतील समुद्रात भराव टाकून समुद्र बुजवणे म्हणजे मुंबईत त्सुनामीला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले.

या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गंभीर असून याबाबत स्थायी समिती अध्यक्ष यांनाही निवेदन देऊन सादर प्रस्ताव रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे राखी जाधव यांनी सांगितले. तसेच मेट्रो प्रकल्पातून निघणारी माती टाकायची असेल तर समुद्रात टाकण्याऐवजी ती माती ज्या ठिकाणी डोंगर त्या ठिकाणी नेऊन टाकण्यात यावी, असा टोला राखी जाधव यांनी लगावला.