मुंबई:- काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक वेळा सरकारच्या धोरणात्मक निर्णय प्रकियेत सहभागी केले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेणार आहेत.
“महाविकास आघाडीमध्ये काही मतभेद आहेत. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मतभेद असलेल्या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. येत्या दोन दिवसांमध्ये ही भेट होऊ शकते”, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची बैठक नुकतीच मुंबई मध्ये झाली होती. महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रकीयेत स्थान देण्यात यावे, अशी मागणी या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी केली होती. या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते त्यांची तक्रार घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे.