सांस्कृतिक दहशतवाद पसरविण्याचे छुपे काम सुरु : डॉ. कसबे

0

संस्था व संघटनांचा एकत्र उपक्रम

पिंपरी : छत्रपतींची खरी उपेक्षा स्वकीयांनीच केली होती. मात्र अठरापगड जातींच्या मावळयांच्या ताकदीवर त्यांनी राज्यकारभार करून कल्याणकारी राजा अशी प्रतिमा जगासमोर निर्माण केली. सध्याचे मोदी सरकार छत्रपतींचे नाव घेऊन संस्कृतीचे दमन करीत आहे. दलितांबद्दल प्रेम व आपुलकी असल्याचा दिखावा करणारे पंतप्रधान मोदी हे वास्तविकरित्या सांस्कृतिक दहशतवाद पसरविण्याचे छुपे काम करीत असल्याची टीका ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केली. पिंपरी संत तुकाराम नगर भागातील संस्था व संघटनांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रामध्ये बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज अभियानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन माजी महापौर योगेश बहल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका सुलक्षणा धर, बाळासाहेब ओव्हाळ, तसेच प्रभाकर ओव्हाळ, शरद जाधव, आर. डी. गायकवाड आदी उपस्थित होते. अशोक सर्वांगीण विकास सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अशोक शिलवंत, मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव हे या कार्यक्रमाचे निमंत्रक तर श्री जगद्गुरू प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण रानवडे हे कार्यक्रमाचे संयोजक होते.

सरकार समाजात दुही पसरविते
व्याख्यानमालेच्या दुसर्‍या सत्रात इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे म्हणाले की, खोटया इतिहासाच्या बनावावर समाजात धार्मिक दुही पसरविण्याचे काम भाजप सरकार करत आहे. 170 वर्षांपूर्वी या भारतात शाळा काढण्याची कामगिरी केलेले महामानव कुठे आणि आता दुर्दैवाने सध्या शाळा बंद करण्याचे वेसण हाती असलेले संघचालक कुठे, असा प्रश्‍न निर्माण होतो आहे. याबद्दल माहिती देताना नव्या पिढीतील विदयार्थ्यांना खोटया इतिहासाची मांडणी असणारे साहित्य व पुस्तके प्रवाहात आणण्याचे काम सुरू आहे. मुलांना खरा इतिहास समजला पाहिजे. पुस्तकांमधून तो प्रकाशित झाला पाहिजे. आपल्या उद्घाटनपर भाषणात माजी महापौर बहल म्हणाले की, संत तुकाराम नगर भागात अशा प्रकारची संयुक्त जयंती साजरी होत असल्याबद्दल अ‍ॅड. रानवडे व डॉ. शिलवंत यांचे कौतुक ककेले पाहिजे.या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. प्रास्ताविक अ‍ॅड. रानवडे यांनी केले तर स्वागतपर मनोगत डॉ. शिलवंत यांनी व्यक्त केले. विजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले तर प्रकाश जाधव यांनी आभार मानले.