जि.प.सभापती रवींद्र पाटील व कुटुंबियांनी दिला मदतीचा हात
यावल : देशात कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आलेली आहे. मोलमजुरी करण्यासाठी बाहेर राज्यात अनेक नागरीक गेले आहे. पण आता लॉकडाऊन असतांना गावाकडे जाण्यासाठी कुठलेच वाहन नाही. असे असतांना अनेक मजूर हे आपल्या गावी जाण्यासाठी पायी निघालेले आहेत. गुरूवार, 2 एप्रिल रोजी साकळी येथील भाजपचे कार्यकर्ते शेतात जात असताना त्यांना काही पुरुष, महिला व लहान मूले पायी जात असताना दिसले असता त्या कार्यकर्त्यांनी जि.प.सभापती रवींद्र पाटील यांना फोन द्वारे संपर्क साधून त्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करता येईल का ? अशी विचारणा केली असता तत्काळ सभापती रवींद्र पाटील यांनी साकळी येथील सक्रीय कार्यकर्ते व भाजपचे शहर अध्यक्ष नितीन तेली ( टेलर) यांच्याशी संपर्क साधून पूर्ण माहिती देऊन त्या वाटसरू लोकांची जेवणाची व्यवस्था करून राहण्याची व्यवस्था करण्याची सूचना केली. शहराध्यक्ष हे शेतात असल्याने त्यांनी आपल्या घरी त्यांचा आई माजी ग्रामपंचायत सदस्या सुलोचना तेली यांना सर्व माहिती देऊन त्या गावी निघालेले लोकांसाठी जेवणासाठी खिचडीची व्यवस्था करण्याचे सांगितले. यावेळी भाजपा कार्यकर्ते डिगंबर ठाकूर, सचिन कोळी, रोहित कोळी, सागर महेश्री, मिलिंद जंजाळे, नाना भालेराव, आकाश न्हावी, विकी तेली आदींनी सहकार्य केले.