रावेर : आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासनाने तालुक्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी चांगले काम केले परंतु सामाजिक शिस्त पाळली न गेल्याने संसर्ग वाढत गेला मात्र आता प्रशासनाला सोबत घेऊन कोरोनाविरुध्द एकत्र लढाई लढायची आहे. कार्यकर्त्यांनी व जनतेने सामाजिक जबाबदारी पार पाडली तर निश्चित कोरोनाला आवार घालता येईल. नागरीकांनी आरोग्य विभागाच्या सूचनेचे पालन करण्याचे आवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी येथील सर्वपक्षीय बैठकीत केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी तहसील कार्यालयात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार बोलत होते.
यांची होती उपस्थिती
सर्वपक्षीय बैठकीला प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकोडे, नगराध्यक्ष दारा मोहोम्मद, पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन, पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, डॉ.एन.डी.महाजन, जिल्हा परीषद सदस्य नंदकिशोर महाजन, कैलास सरोदे, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, दीपक पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, रवींद्र पवार, डॉ.राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख दिलीप कांबळे, राजू सवर्णे, अशोक शिंदे, बाळु शिरतुरे, अॅड.योगेश गजरे उपस्थित होते.
बैठकीला लोकप्रतिनिधींच्या दांड्या
तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आमदार शिरीष चौधरी यांनी कोरोनासंदर्भात बोलविलेल्या महत्वाच्या बैठकीला तालुक्यात अनेक पंचायत समिती सदस्य, जिल्हा परीषद सदस्यांनी दांड्या मारल्याने आश्चर्य व संताप व्यक्त करण्यात आला.
पुढील सहा महिने महत्वाचे : प्रांतधिकारी
कोरोनाच्या संक्रमणापासून बचावाकरिता पुढील सहा महिने काळजी घेणे खुप गरजेचे आहे. कोरोना रुग्णांची संख्या तालुक्यात वाढत असून यामुळे रोगप्रतिकाराक शक्ती कमी असलेल्यांनी लवकरात-लवकर उपचार करा. वयोवृध्द व आजारी रुग्णांची देखील काळजी घ्या, रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांचा मृत्यू टाळण्यासाठी रुग्णाला डॉक्टरांपर्यंत पोहचवा, त्यांची तपासणी करा, गरजेनुसार स्वॅब व ऑक्सीजनची लेव्हल तपासून घ्या, ताप, सर्दी, खोकल्याकडे दुर्लक्ष करू नका, तपासणीला घाबरू नका, असे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी सांगितले.
प्रत्येकानेच काळजी घेणे गरजेचे ः मान्यवरांचा सूर
जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन म्हणाले की, आताच तालुक्यातील जनता लॉकडाऊनमधून बाहेर आली आहे. अनेक गरीब कुटुंब रोजगाराच्या शोधात बाहेर पडत असतांना जनता कर्फ्यू लावु नये तसेच प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. भाजपा उपाध्यक्ष पद्माकर महाजन म्हणाले की, रावेर शहरात हात गाड्यांसाठी नगरपालिका प्रशासनाने इतर ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी. भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर म्हणाले की, कोरोनाबाबत तालुक्यात भीतीचे वातावरण असून प्रशासन व पदाधिकारी यांच्यात समन्वय गरजेचा आहे. शिवसेना उप जिल्हाप्रमुख *प्रल्हाद महाजन म्हणाले की, कोविड सेंटरवरुन येणार्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, त्यांना सुविधांचा अभाव दिसतोय म्हणून प्रशासनाकडे तक्रारी वाढल्या आहेत.
कोरोना योद्ध्यांचा बैठकीत सत्कार
सर्वपक्षीय बैठकीत कोरोनाविरुध्द लढणारे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, डॉ.एन.डी.महाजन, डॉ.शिवराज पाटील, मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांचा आमदार शिरीष चौधरी यांनी सत्कार केला.