ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे मत
18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन
पुणे : या देशातील सामान्य माणूस हा लोकशाहीचा संरक्षक आहे. या सामान्य माणसाच्या सत्सत्विवेक बुद्धीवरच लोकशाही टिकून आहे. परंतु, आज व्देषाचा विषाणू पसरवत त्याच सामान्य माणसाला जीवानिशी संपविले जात आहे. सहिष्णू भारतात गाय महत्त्वाची की, माणसे हे ठरवावे लागेल, असे मत 18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले.
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित 18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार आणि 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते रविवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार सुप्रिया सुळे, संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप बराटे, काकासाहेब चव्हाण, चित्रकार सुनील देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे आणि पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
सहिष्णूता हा भारतीयांचा धर्म
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या चार सूत्रांच्या माध्यमातून घटना परिपक्क झाली आहे. प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असतो. मात्र, आपल्या धर्मग्रंथाबरोबर संविधान देखील पूजनीय असले पाहिजे. या संविधानानेच सगळ्यांना मानाने जगण्याची शाश्वती दिली आहे. जोपर्यंत संविधान पद्धती भारतात आहे, तोपर्यंत कोणालाही भयभयीत होण्याचे कारण नाही. भारत हा सर्वधर्मांचे माहेरघर असून त्याला हजारो वर्षांची परंपरा आहे. सहिष्णूता हा भारतीयांचा धर्म असून असहिष्णूता हा अपघात आहे. भारतीय संवादी आणि समन्वयवादी भूमिका बाळगून असतात, त्यांना टोकाची भूमिका मान्य नाही. साहित्यिक विचारवंतांची शारीरिक आणि वैचारिक हत्या केली जात आहे, हे खेदजनक असल्याचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सांगितले.
राष्ट्रवादीकडून ट्रान्सजेंडर उमेदवारांना तिकीट देण्यासाठी आग्रही
साहित्यातून संस्कार होतात पण ही पिढी दिवसेंदिवस साहित्य, भाषा यापासून दूर जात आहे. मराठी भाषेतील काही शब्द उच्चारताना आजही माझ्या अंगावर शहारे येतात आणि मराठी भाषेच्या गोडव्याची प्रचिती येते. आताची पिढी सोशल माध्यमांच्या भोवर्यात अडकली आहे. नामवंत वाचनीय दैनिकातील अग्रलेखांची जागा आणि शब्दसंख्या मर्यादित झाली आहे. आपली आणि उद्याची पिढी यांच्यात साहित्याची सांगड घालणे आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेर फिरताना महाराष्ट्राची सांस्कृतिक समृद्धी लक्षात येते. या मातीत साहित्य-संस्कृतीची बीजे पेरलेली असल्यानेच लोकशाहीच्या मंदिरात सरोगसी आणि ट्रान्सजेंडर्स यासारखी बीले पारीत करून घेतली. आगामी काळात राष्ट्रवादीकडून ट्रान्सजेंडर उमेदवारांना तिकीट देण्यासाठी मी आग्रही भूमिक घेईन, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
संविधान हाच आधार
प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवत घराबाहेर संविधान हाच आधार मानला पाहिजे. हिंदू राष्ट्राचा आग्रह धरला जात असल्याने संविधान मूल्यांना तडा जात आहे. संभ्रमित अवस्था निर्माण करून सामान्यांचा गोंधळ उडविण्याचे काम केले जात आहे, असे यावेळी बोलताना प्रेमानंद गज्वी यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि या संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप बराटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव वि. दा. पिंगळे यांनी केले, तर देवेंद्र सूर्यवंशी यांनी आभार मानले.