पुणे । उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. अशावेळी बाहेर पडल्यानंतर थंडगार सरबत पिण्याची इच्छा सर्वांनाच होत असते. शिवाय, उन्हाळ्याचा हंगाम असल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी विविध सरबताच्या गाड्या, स्टॉल्सची संख्यादेखील वाढली आहे. कुठेही गेलात तरी थंडगार सरबत अगदी सहज उपलब्ध होत आहे. मात्र, हे सरबत विके्रते आवश्यक ती काळजी घेत आहेत का? हे ग्राहकांनीही पाहण्याची गरज आहे. अनेकदा अस्वच्छतेमुळे व भेसळीमुळे सरबत पिणार्यांचे आरोग्य बिघडू शकते. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) परवाना नोंदणी शिवाय कुठल्याही प्रकारच्या शीतपेयाची विक्री करता येत नाही. नियमाचे पालन न करणार्या सरबत केंद्रांवर एफडीएची नजर असून 6 एप्रिल ते 24 एप्रिल या कालावधीत 206 ठिकाणांच्या तपासण्या एफडीए कडून करण्यात आल्या आहेत. तसेच पाच ठिकाणांवर कारवाई करुन 21 हजार रुपये दंड वसून करण्यात आला आहे.
47 ठिकाणचे नमुने गोळा करण्यात आले
उन्हाचा कडाका वाढत असल्याने नागरिकांकडून थंड पेयांना पसंती देण्यात येते. रखरखत्या उन्हात बाहेर पडल्यानंतर आपोआपच नागरिकांची पाऊले रसवंती गृह, आयस्क्रीम पार्लर, ज्यूस सेंटरसकडे वळतात. प्रत्येक रसवंती गृह, शेतपेप विक्रेत्यांनी स्वच्छतेची काळजी घेणे, तसेच स्वच्छ पाणी वापरने आवश्यक आहे. परंतु अनेक विक्रेत्यांकडून स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. एफडीए कडून एक विशेष मोहिम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत शहरातील शीतपेयांचे स्टॉल्स, दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. जेथे स्वच्छता पाळण्यात येत नाही, त्यांच्यावर एफडीएकडून दंडही आकारण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आत्तापर्यंत 206 तपासण्या करण्यात आल्या असून त्यातील पाच विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच 47 ठिकाणचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. त्यात एक रसवंती गृह, आठ ज्यूस सेंटर, एकोणतीस आयस्क्रीम, गोळावाले, चार बर्फाचे कारखाने, व पाच आंबा विक्रेते यांच्याकडील नमुने तापसणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
6 महिने कारावास, 5 लाख दंड
एफडीए कडून आत्तापर्यंत 9 जणांना परवाने आणि 34 नोंदणी दाखले देण्यात आले आहेत. महाराष्ट्र अन्न सुरक्षा व मानद कायदा 2006 नियम व नियमने 2011 अंमलात आलेला असल्याने या कायद्यान्वे अन्न व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक आहे. विना परवाना अन्न व्यवसायक केल्यास संबंधितांवर फौजदारी खटला दाखल केला जातो. तसेच त्यांना 6 महिने कारावास व 5 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी परवाना घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी स्वच्छता पाहूनच रसांचे सेवण करावे. उघड्यावरचे अन्न खाणे टाळावे असे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे.त्याचबरोबर तपासणी मोहिम संपूर्ण उन्हाळ्यात चालणार असल्याचे एफडीएचे सहाय्यक आयुक्त संपत देशमुख यांनी सांगितले.