यावल। तालुक्यातील भालोद येथील इमर महिला बहुउद्देशीय संस्था व राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बालवाङमयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात बालकवी मतीन अचलपुरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सेवाभावी वृत्तीने निर्माण केलेल्या साहित्याने संपूर्ण मानवजातीचे उत्थान होते. त्यामुळे विद्यार्थी व तरुणांनी आपल्या क्षमता ओळखून त्यांना सत्कार्यासाठी उपयोगी आणावे. चांगल्या साहित्याचा आपल्या आयुष्यावर चांगला परिणाम होत असल्याचे प्रतिपादन कवी अचलपुरी यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जाकिर हुसेन हायस्कुलचे माजी प्राचार्य रऊफ शेख उपस्थित होते.
विविध विषयांवर केले मार्गदर्शन
ज्येष्ठ साहित्यिक कय्युम राज मारुलवी यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेत रहिम रजा यांनी कथा आणि बालवाङमय, अली अंजुम रिजवी यांनी सामान्य ज्ञान, एम. रफिक यांनी निबंध लेखन, फारुक सैय्यद यांनी कथालेखन यावर तर प्रख्यात बालकवी मतीन अचलपुरी यांनी बालकांची शायरी यावर मार्गदर्शन केले. प्रस्तावना जाबिर खान यांनी तर सुत्रसंचालन आरिफ खान यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून अहमद कलिम फैजपुरी, शकिल अहमद, बिलाल, अनिस अहमद, जिस्मेअली जनाब आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी साबिर खान, मुनाफ खान, इस्माईल खान, सादिक खान, इम्रान खान, आसिफ खान, अकबर खान यांनी परिश्रम घेतले.