मुंबई । शेतकरी प्रश्नांवर सुरु असलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्याची सुरुवात म्हणून सुकाणू समितीच्या वतीने राज्यव्यापी जनजागरण यात्रा सुरु करण्यात येत आहे. सोमवार, 10 जुलै रोजी नाशिक येथे भव्य एल्गार सभा घेऊन या जनजागरण यात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे. सुकाणू समितीमध्ये सामील असलेल्या सर्व प्रमुख संघटना या जनजागरण यात्रेत सामील होत आहेत. सुकाणू समितीचे सदस्य संपूर्ण राज्याचा दौरा करीत प्रमुख 14 ठिकाणी भव्य जाहीर सभांना संबोधित करणार आहे. राज्य सरकारने कर्जमाफी संदर्भात केलेल्या फसवणुकी विरोधात यात्रेतून जनजागरण केले जाणार असून संपूर्ण कर्जमुक्ती व स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी लढ्याची दिशा या जनजागरण यात्रेतून ठरवली जाणार आहे. शेतकर्यांची व राज्यातील तमाम जनतेची मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या घोषणेतून फसवणूक केली असल्याचा आरोप करत शेतकर्यांशी संवाद साधण्यासाठी सुकाणू समितीने राज्यव्यापी जनजागरण दौरा करण्याचे ठरविले आहे.
अशी निघणार यात्रा
नाशिक येथून दिनांक 10 जुलै रोजी सुरु होणारी जनजागरण यात्रा ठाणे (पालघर), रायगड (रत्नागिरी, सिंधुदुर्ग), अहमदनगर, धुळे (नंदुरबार, जळगाव), अमरावती (यवतमाळ), बुलढाणा (अकोला,वाशीम), वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड , परभणी, हिंगोली, औरंगाबाद, जालना, बीड (लातूर), सोलापूर (उस्मानाबाद), कोल्हापूर, सांगली मार्गे जाणार असून पुणे येथे दिनांक 23 जुलै रोजी यात्रेचा समारोप होणार आहे.
जाचक अटींना विरोध
शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. प्रत्यक्षात मात्र अत्यंत जाचक अटी लावण्यात आल्या. यात कर्जमाफी रकमेसाठी दीड लाखाची मर्यादा लावण्यात आली. थकीततेसाठी 30 जून 2017 ची अट घालण्यात आली. नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना मात्र दिलासा मिळाला नाही. पॉलीहाउस, सिंचन, शेडनेट, इमूपालन आदींसाठी घेतलेल्या कर्जांना कर्जमाफीतून वगळण्यात आले. चुकीच्या आकड्यांच्या आधारे जनतेची दिशाभूल करण्यात आली. यामुळे जनजागरण यात्रेत शेतकर्यांच्या मनातील या भावना समजून घेऊन लढ्याची पुढील रणनीती ठरविली जाणार आहे.
व्यापक प्रचारासाठी यात्रा
शेतीमालाला भाव मिळावा व शेतकर्यांच्या निव्वळ उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यात्रे दरम्यान या मागणीसाठी व्यापक प्रचार करण्यात येणार आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी गावोगाव पोहचविण्यासाठी पुस्तिका व प्रचार साहित्य तयार करण्यात आले आहे. यात्रेद्वारे हे साहित्य शेतकर्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. सुकाणू समितीमध्ये सामील झालेल्या सर्व शेतकरी संघटनांनी यात्रेसाठी स्वतंत्र प्रचार रथांचे नियोजन केले आहे. जिल्हा स्थरावर यात्रेच्या निमित्ताने सर्व संघटनांनी एकत्र येत भव्य जाहीर सभांचे आयोजन केले आहे.
शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेतून सरकारने शेतकर्यांची फसवणूक केलेली आहे. सुकाणू समितीने याचा निषेध केला आहे. म्हणूनच सुकाणू समितीच्या माध्यमातून राज्यव्यापी जनजागरण दौर्यातून सरकारचा दिशाभूल करणारा चेहरा जनतेसमोर उघडकीस आणणार आहोत.
– डॉ. अजित नवले
राज्य समन्वयक, सुकाणू समिती