सोशल मीडियासमोर निवडणूक आयोग हतबल

0

मुंबई । राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रचाराची मुदत संपली आहे. सोशल मीडियावर प्रचार करण्यावरही बंदी आहे. तसे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचे आदेश आयोगाने दिले आहे. मात्र, यामधील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टता नसल्याने नेमकी काय कारवाई करावी, हा प्रश्‍न अधिकार्‍यांना पडला आहे तसेच या प्रचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणताही प्रभावी उपाय नसल्याने, प्रशासन हतबल झाले असल्याचे चित्र दिसत आहे.

फेसबुक टाइमलाइनवर आणि व्हॉट्सअ‍ॅप प्रचार चालूच मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, ठाणे महापालिकांच्या निवडणुका 21 फेब्रुवारीला होत असून, राज्य निवडणूक आयोगाने दिलेली प्रचाराची मुदत रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपली. त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराची सांगता झाली. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मुदतीनंतर कोणत्याही प्रकारे उमेदवाराला प्रचार करता येणार नाही. यात फेसबुक, ट्विटर, टेलिफोनिक कॉल, संदेश, व्हॉट्सअ‍ॅप असा कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले असून, तसे निदर्शनास आल्यास दंड आकारण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार अधिकार्‍यांकडून उमेदवारांना तशा प्रकारच्या नोटीसही देण्यात आल्या होत्या. मात्र, असे असतानाही उमेदवारांचे टेलिफोनिक कॉल नागरिकांना येत आहेत. तसेच मतांसाठीचे संदेशही येत आहे. आपापल्या फेसबुक टाइमलाइनवर आणि व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे उमेदवारांचा सर्रास प्रचार सुरू आहे.