स्वच्छ पुरस्कारांची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांवर

0

पुणे । शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना सोबत घेऊन पालिका वेगवेगळ्या उपाययोजना तसेच जनजागृती करत आहे. नागरिकांनी घरातच कचरा जिरविण्यावर भर द्यावा, यासाठी पालिका प्रशासन स्वच्छ पुरस्कार देते. या पुरस्कारासाठी महापालिकेकडे अर्जच येत नसल्याने आता अर्ज घेऊन येण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांकडे देण्यात आली आहे. त्यानुसार, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरिक्षक आणि निरिक्षक सोसायट्या तसेच घरात अथवा बंगल्यामध्ये कचरा प्रक्रीया यशस्वीपणे उभारलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून स्पर्धेसाठी अर्ज भरून घेत आहेत. महापालिकेची 15 क्षेत्रीय कार्यालये असून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास 200 पेक्षा अधिक अर्ज गोळा करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. तसेच हे अर्ज मोठ्या प्रमाणात येणार असल्याने या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत 30 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

स्वच्छ भारत अभियानाशी हा पुरस्कार संलग्न करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी महापालिकेने त्याची घोषणा केली. त्यासाठी सुमारे सोसायटी आणि वैयक्तिक स्तरावर सुमारे 30 पुरस्कार दिले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी पुणेकरांना 2 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर 2017 ही मुदत देण्यात आली आहे. मात्र, अवघे 4 अर्ज आल्याने स्पर्धा रद्द करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नामुष्की ओढावयाला नको, म्हणून हे अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

लोकसहभाग वाढविण्याचे प्रयत्न
या स्पर्धेत 5 हजारांपासून 21 हजार रुपयांपर्यंत असे सुमारे 30 पुरस्कार प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यांची एकूण रक्कम 2 लाख रुपये इतकी असून त्याचे वितरण 26 जानेवारी 2018 ला केले जाणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, आता क्षेत्रीय कार्यालयांकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत. तसेच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मुख्यकार्यालयातही हे अर्ज स्विकारले जात आहेत. स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून या स्पर्धेत लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच अर्ज घेऊन येण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांवर सोपविण्यात आली आहे.