मुंबई । राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला आता चांगलाच रंग चढत आहे. भाजपकडून नेमकी कोणाचे नाव सुचवले जाणार, याबाबत चर्चा रंगत असतानाचा शिवसेनेने मात्र राष्ट्रीय कृषी आयोगाचे अध्यक्ष डॉ. एम एस स्वामीनाथन यांचे नाव सुचवले आहे. शेतकर्यांच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या शिवसनेने डॉ. स्वामीनाथन यांचे नाव पुढे आणल्यामुळे या नावाचीही आता चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या (रविवारी) भेटणार होणार आहे.
म्हणून केली त्यांच्या नावाची मागणी?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावावर भाजपला शिक्कामोर्तब करायचे नसेल तर डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना राष्ट्रपती करा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ही मागणी करताना संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार म्हणून शिवसेनेची मोहन भागवत यांना पहिली पसंती आहे. परंतु भाजपचा मोहन भागवत यांच्या नावाला विरोध असेल तर हरीतक्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित करावे, अशी आमची मागणी आहे.
कोण आहेत स्वामीनाथन?
डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 साली झाला. 1944 साली ते त्रावणकोर विद्यापीठातून बी.एस्सी उत्तीर्ण झाले. 1947 साली कोईम्बतूर शेतकी महाविद्यालयातून त्यांनी कृषी पदवी संपादन केली तर 1948 साली दिल्लीच्या भारतीय शेती संशोधन संस्थेत जनुकशास्त्र व वनस्पती पैदाशीवर असोसिएटशिपही त्यांनी केली. 1949 मध्ये नेदरलँड्सच्या वॅजेनिन्जेन शेती विद्यापीठात युनेस्कोकडून जनुकशास्त्रासाठी त्यांना फेलोशिप देण्यात आली होती. 1952 मध्ये इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातून बटाट्यावरील संशोधनासाठी पीएचडी केली. 1952 साली अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात जनुकशास्त्रातील सहायक संशोधक, 1954 साली कटकच्या भात संशोधन केंद्रात जनुकशास्त्र संशोधन व शेती संशोधनासाठी मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 1954 ते 72 मध्ये दिल्लीच्या भारतीय शेती संशोधन परिषदेत त्यांनी संशोधनाचे काम केले आहे. शेती संशोधनासाठी मार्गदर्शन व व्यवस्थापन, 1972 ते 79 मध्ये भारतीय शेती संशोधन संस्थेचे ते महासंचालक होते. केंद्रीय शेती व शिक्षण विभागाचे सचिव तर 1979 ते 80 मध्ये केंद्रीय शेती व सिंचन विभागाचे सचिव होते. 1980 मध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष तर 1980 ते 82 मध्ये नियोजन आयोगात शेती, ग्रामीण विकास, विज्ञान व शिक्षण विभागाचे सदस्य होते. 1982 ते 88 मध्ये फिलिपाइन्समधील आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्राचे महासंचालक तर 1989 पासून ते चेन्नईमधील एम. एस. स्वामीनाथन संशोधन संस्थेचे अध्यक्ष होते. 2004 साली राष्ट्रीय कृषी आयोगाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.