फैजपूर- माणुसकी हरवत चालली आहे अशी नित्य ओरड होत असलेल्या वातावरणात पुन्हा एकदा माणुसकीचे व प्रामाणिकपणाचे दर्शन घडले. चिनावल येथे एका नवरदेवाच्या हातातील एक तोळ्याची अंगठी लग्नाच्या दिवशी हरवली होती. खूप शोधाशोध करूनही ती सापडली नाही. त्यामुळे सगळे बेचैन झाले होते. पण नवरदेव नवरीच्या मित्रांनी ती अंगठी त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर सर्वांनी समाधान व्यक्त केले.
आहेरात मिळालेली अंगठी हरवली
चिनावल येथील प्रफुल्ल डिगंबर कोल्हे या नवरदेवाचा रोझोदा (तालुका रावेर) येथील कामसिद्ध मंदिरावर दिनांक 31 मे रोजी विवाह झाला. नवरदेव प्रफुल्ल यास आहेरात मिळालेली एक तोळ्याची सोन्याची अंगठी नाचण्यासाठी नवरदेवाला घोड्यावरून खाली उतरवले असता लग्न मंडपाजवळ हरवली. दाम्पत्य घरी आल्यानंतर त्यांना आपल्या बोटातली अंगठी हरवल्याचे समजले. पण इलाज नव्हता कोणाला विचारणार आणि कोणी कोणाकडे सांगणार, अशी परीस्थिती त्यांची झाली. परंतु लग्नासाठी उपस्थित असलेले नवरीचे व नवरदेवाचे मित्र फैजपूर येथील भूषण भंगाळे हे जे.टी.महाजन अभियांत्रिकि महाविद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीस आहे. भंगाळे यांचा नवरदेव प्रफुल्ल यांना फोन आला की तुमची हरवलेली अंगठी आम्हाला सापडली आहे. आम्ही तुमच्या घरपोच आणून देतो. या दोघा मित्रांनी हे हरवलेली अंगठी चिनावल येथे नवविवाहितांच्या घरी येऊन परत केली. फैजपूर येथील रहिवासी असलेले भूषण भारंबे यांनी एक तोळे सोन्याची अंगठी सापडल्याचा कोणताही स्वार्थ न करता नवविवाहित दाम्पत्याला परत केली. या त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल चिनावल परीसरात त्यांचे कौतुक होत आहे. तसेच नवरदेवाचे वडील दिगंबर कोल्हे यांनी भूषण भंगाळे यांचा प्रामाणिकपणाबद्दल त्यांच्या घरी सत्कार केला.