नवी दिल्ली । ईएमआय भरायला पैसे नसल्यामुळेे आयपीएल पदार्पणापूर्वी दोन वर्ष आपली गाडी असल्याचे लपवून ठेवले होते, अशी आठवण भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने सांगितली. यू-ट्युबवर गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या शोमध्ये हार्दिकने दिलखुलास गप्पा मारल्या. या कार्यक्रमात 2015 मध्ये आयपीलमध्ये पदार्पण करण्यापूर्वीचा संघर्ष आणि आर्थिक त्रास यांच्याविषयी हार्दिक पंड्याने सांगितले. गाडीचे हप्ते भरण्यासाठी त्यावेळी येणारी पै न् पै वाचवावी लागत होती. मी पाच आणि दहा रुपयांचीही बचत करायचो. जवळपास तीन वर्ष मी स्ट्रगल केला, असे हार्दिकने सांगितले. आयपीएलच्या वेळी मला 70 हजार रुपये मिळाले. आता काही काळ आपण तग धरू शकतो, असे मला वाटले. दोन वर्ष आम्ही ईएमआय भरला नव्हता.
आम्ही स्मार्ट होतो. आमची गाडी मी लपवून ठेवायचो. कारण ती हातून जावी, असे मला वाटत नव्हते, अशी आठवण हार्दिकने सांगितली. कुठलीही नवीन गोष्ट विकत घेण्याऐवजी त्या तीन वर्षांत आम्ही कारसाठी पैसे वाचवून ठेवले. अन्न आणि कारचे हप्ते या दोनच गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या होत्या, असे हार्दिक म्हणाला. हार्दिक पंड्याने पदार्पण केले, त्याच वर्षी मुंबई इंडियन्सने आयपीएल जिंकली. देव दयाळू आहे. पहिल्याच वर्षी आम्ही आयपीएल जिंकली आणि मला 50 लाख रुपयांचा चेक मिळाला. तेव्हा मला मोफत कार मिळाली व मी एक कार विकतही घेतली, असे हार्दिकने सांगितले.