हे सभागृह खोटे बोलण्यासाठी आहे का?

0
बोंड अळीच्या नुकसान भरपाईचे जाहीर केलेले 37 हजार 500 रूपये कधी देणार ते सांगा?
धनंजय मुंडेंचा सरकारला खडा सवाल
नागपूर – हे सभागृह खोटे बोलण्यासाठी आहे का? याच सभागृहात डिसेंबर 2017 मध्ये जाहीर केलेले कापसाच्या बोंड अळीच्या नुकसान भरपाई पोटी 37 हजार 500 रूपये आणि धानावर आलेल्या तुड-तुड्या रोगाची नुकसान भरपाई कधी देणार, ते सांगा आणि नंतरच कामकाज करा , असा सवाल करीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी विधानपरिषदेत पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला.
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी धनंजय मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेसच्या सदस्यांनी कापसाच्या बोंडअळीची नुकसान भरपाई तसेच धानावर पडलेल्या रोगाच्या नुकसान भरपाईचा प्रश्न लावुन धरला. कामकाज सुरू होताच कापसाच्या बोंडअळीचे आणि धानाच्या नुकसान भरपाईची रक्कम केव्हा देणार, असा प्रश्न केला. याबाबत नियम 289 अन्वये स्थगन प्रस्ताव उपस्थित करून सभागृहात दिलेल्या आश्वासनाची सरकारला पुर्तता करायची नसेल तर कामकाज तरी करून काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित करतानाचा हे सभागृह खोटे बोलण्यासाठी आहे का? असा सवाल केला. डिसेंबर 2017 मधील अधिवेशनात  बोंडअळीच्या नुकसान भरपाई पोटी 37 हजार 500 रूपये जाहीर करून दोन-दोन हजार रूपये देऊन शेतकऱ्यांची फसवणुक करता का?  असा आक्रमक सवाल केला.