१० टक्के आरक्षण हे नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणारे आहे – नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली : युपीए सरकारमध्ये शौचालये, रेल्वे मार्ग, घरे, वीज-गॅस जोडणींची कामे ज्या वेगाने सुरु होती त्याच वेगाने ही कामे चालली असती तर भरपूर वर्ष लागली असती. माझ्या सरकारने ही सर्व कामे वेगाने केली. १० टक्के आरक्षण हे नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणारे आहे. आधीपासून लागू असलेल्या आरक्षणाशी छेडछाड न करता नवीन आरक्षण दिले. काही जण नव्या आरक्षणावरुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कारस्थान आपल्याला हाणून पाडायचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते दिल्लीच्या रामलीला मैदानावर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की,चोर देशात असो किंवा विदेशात चौकीदार एकालाही सोडणार नाही. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला चौकशीसाठी बोलावण्यात आले. नऊ तास बसवून माझी चौकशी केली. देशाला प्रधानसेवक कसा हवा ते तुम्ही ठरवा. रात्र-दिवस मेहनत करणारा, कष्ट करणारा, भावी पिढीचा विचार करुन १८-१८ तास काम करणारा प्रधानसेवक तुम्हाला हवा की, देशाला गरज असताना कधीही सुट्टीवर जाणार प्रधानसेवक हवा. ते तुम्हीच निवडा. माझ्याविषयी भरपूर अपशब्द बोलले जात आहेत पण चौकीदार थांबणार नाही, आता तर सुरुवात झाली आहे.

काँग्रेसची फर्स्ट फॅमिली स्वत:ला कायद्यापेक्षा मोठी समजते. कोर्टाकडून समन्स बजावूनही सुनावणीला हजर राहत नाही. ज्यांचा देशाच्या संस्थांवर विश्वास नाही ते देशाचा आदर कसा करणार ? जे जामिनावर बाहेर आहेत त्यांचा कायदा आणि संस्थांवर विश्वास नाही अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

पुढे मोदी म्हणाले, एका व्यक्तीविरोधात सगळे एकजूट होत आहेत. विरोधकांना देशात मजबूत सरकार नको, मजबूर सरकार हवे आहे. जेणेकरुन त्यांना भ्रष्टाचार करता येईल. देशाला मजबूत सरकार हवे आहे पण विरोधकांना कुटुंब, नातेवाईकांचे भले करण्यासाठी संरक्षण डीलमध्ये दलाली खाण्यासाठी मजबूर सरकार हवे आहे असा आरोपही मोदींनी केला.