नवी दिल्ली: आज २६ ‘कारगिल विजयी’ दिवस आहे. २१ वर्षापूर्वी भारताने कारगिल युद्ध जिंकून पाकिस्तानला धडा शिकविला होता. आज संपूर्ण देशात कारगिल युद्धाची आठवण म्हणून कारगिल दिवस साजरा करण्यात येत आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात” या रेडीओ कार्यक्रमातून भारत-पाकिस्तान संबंधावर भाष्य केले आहे. २१ वर्षापूर्वी कारगिल युद्धानंतर भारताने पाकिस्तानला मैत्रीचे हात पुढे केले. पाकिस्तानशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु विनाकारण प्रत्येकाशी शत्रुत्त्व करणे दुष्टांच्या स्वभावामध्येच असते अशा शब्दात पाकिस्तानवर टीका केली.
सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट आहे, मात्र यातून आपल्याला स्वतंत्र मिळवायचे असून आत्मनिर्भर व्हायचे आहे. १५ ऑगस्टला आत्मनिर्भर होण्याचा आणि कोरोनापासून स्वतंत्र मिळविण्याचा संकल्प करा, काही तरी नवीन शिकण्याचा आणि शिकविण्याचा प्रयत्न करा असे मोदींनी यावेळी सांगितले.
पाकिस्तानने आजपर्यंत भारताची जमीन हस्तगत करण्याच्या आणि संघर्षाचीच योजना आखल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. कारगिल विजयी दिवसासह विविध विषयांवर मोदींनी यावेळी भाष्य केले आहे.
क्रीडा विषयाला देखील मोदींनी यावेळी हात घातला. “एक काळ असा होता ज्यावेळी क्रीडा क्षेत्रात मोठी शहरे, नामांकित कुटूंब, नामांकित शाळा / महाविद्यालये यांचाच वरचष्मा होता मात्र आता खेडी, लहान शहरे आणि सामान्य कुटूंबातील तरुणही क्रीडा क्षेत्रात आपले नाव मोठे करत असल्याचे मोदींनी सांगितले.