मुंबई: राज्य सरकारने बेस्ट आणि जीम सुरु करण्याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील जीम बंद आहेत. २५ ऑक्टोंबरपासून जीम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच बेस्टच्या बसेस पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची परवानगीही देण्यात आली आहे. लोकल प्रवासाची मुभा सार्वजनिक करण्यात आलेली नाही त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत. याचा ताण बेस्ट सेवेवर पडत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगमुळे बेस्टच्या बसेस पूर्ण क्षमतेने सुरु नाही. मात्र आता राज्य सरकारने बेस्टला पूर्ण क्षमतेने चालविण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र राज्य सरकारने बेस्ट प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे लवकरच बेस्ट बसेस पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे, बेस्टसाठी ही दिलासादायक बाब आहे.
बेस्टमधून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यासोबतच जीम खुल्या करण्याचा निर्णयदेखील राज्य सरकारनं घेतला आहे. २५ ऑक्टोबरपासून राज्यातल्या जीम सुरू होतील. त्यामुळे जीम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कंटेन्मेंट झोनमधील जीम बंदच राहतील. राज्य सरकारने घेतलेले हे दोन निर्णय महत्त्वाचे मानले जात आहेत.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबतच सर्वसामान्यांना नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याचा निर्णय पुढील २-३ दिवस घेण्यात येईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिली. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडून लवकरच लोकल प्रवासाबद्दल निर्णय घेतला जाईल, असं ते पुढे म्हणाले. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.