२६ जानेवारीला मोदी सरकार करणार शेतकऱ्यांसाठी ‘ही’ मोठी घोषणा

0

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या कर्जाला माफी देण्यासह कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर सवलती देण्याचा विचार करीत आहेत. येत्या २६ जानेवारीला शेतकऱ्यांसाठीच्या योजनेची घोषणा होण्याची शक्यता आहे. सरकार प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा हजार रूपये टाकणार आहे. ही रक्कम बियाणे, शेती साहित्यासाठी देण्यात येणार आहे असे सांगण्यात येत आहे.

यासाठी मोदी सरकारने प्रत्येक राज्याकडून आणि मंत्रालयाकडून शेतकऱ्यांची आकडेवार मागितली आहे. दुसरा पर्याय म्हणून केंद्र सरकार तेलगंण मॉडेलची चाचपणी करत आहे. यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षातून दोन वेळेस प्रति एकर ४००० रुपये जमा करण्यात येतील. यासाठी सुमारे २ लाख कोटींची तरतूद करावी लागणार आहे.

ओडिसामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्षाला दहा हजार रूपये राज्य सरकारकडून टाकले जातात. त्यामुळे ओडीसा सरकारवर वर्षाला १.४ लाख कोटी रूपयांचा बोजा पडतो. ओडीसा सरकारच्या या योजनेवर पंतप्रधान कार्यालय गांभीर्याने विचार करत आहे.

केंद्र सरकारच्या योजनेत सरसकट सर्वच शेतकऱ्यांचा समावेश होणार नसल्याची शक्यता आहे. या योजनेतून भूमीहिन शेतकऱ्यांना वगळण्या येण्याची शक्यता आहे. भूमीहिन शेतकऱ्यांवर शेत कर्ज नसल्याचा तर्क यासाठी देण्यात आला आहे.

सरकारने आधीच रिझर्व्ह बँकेकडे हंगामी लाभांशाची विचारणा केली असून येत्या दीड महिन्यांत जास्तीचा पैसाही बँकेकडे मागू शकेल. आरबीआयला तिच्याकडील गंगाजळीत किती पैशांची गरज आहे यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी लवकरच उच्चाधिकार समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीला २० दिवसांत तिचा अहवाल सादर करण्यास व बँकेकडून प्रचंड निधी सरकारला हस्तांतरीत करण्याचा मार्ग मोकळा करण्यास सांगितले जाईल.