अहमदाबाद : गुजरातमधील उत्तर भारतीयांविरुद्ध उसळलेल्या हिंसेनंतर गेल्या आठवड्याभरात ५०,००० मजूर उत्तर प्रदेश,बिहारमध्ये परतले आहेत. तर दुसरीकडे उत्तर भारतीयांच्या पलायनाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याऐवजी भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.
गुजरातमध्ये २८ सप्टेंबरला १४ महिन्यांच्या एका चिमुकलीवरी बलात्काराची घटना घडली होती. हा बलात्कार बिहारमधून आलेल्या एका कामगाराने केल्याचे समोर येताच राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सोशल मीडियावर उत्तर भारतातून येणाऱ्या कामगारांविरुद्ध संदेश व्हायरल झाले. अनेक ठिकाणी कारखान्यांमध्ये,गावांमध्ये उत्तर भारतीय कामगारांना मारहाण करण्यात आली तर काही जणांना घरातून बाहेर काढण्यात आले. या साऱ्यामुळे धास्तावलेल्या उत्तर भारतीय कामगारांनी गावी पलायन करण्यास सुरुवात केली. एकीकडे ५०,०००हून अधिक कामगारांनी पलायन केले असताना दुसरीकडे हे सगळे कामगार सणांसाठी घरी गेल्याचा अजब दावा गुजरात प्रशासनाने केला आहे.
गुजरातमधील हे पलायन थांबवण्यासाठी राजकीय नेत्यांकडून कोणतीच ठोस पाऊलं उचलली जात नसून भाजप-काँग्रेस या हिंसाचाराचं खापर एकामेकावर फोडत आहे. राज्यात अनागोंदी माजवण्यासाठी काँग्रेसने ठाकोर समाजाला हाताशी धरून जाणून बुजून हा हिंसाचार घडवून आणल्याचे आरोप भाजपने केले आहेत. तर इतक्या मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय गुजरात सोडून जात असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. तर अल्पेश ठाकोरच्या संघटनेने लोकांना भडकवण्यात एक महत्त्वपू्र्ण भूमिका बजावल्याचा आरोप जेडीयूने केला आहे ‘ एकीकडे काँग्रेस बिहारमध्ये ठाकोर समाजात प्रचार करण्यासाठी अल्पेश ठाकोरला महत्त्वाचं पद देते तर दुसरीकडे तोच ठाकोर समाज गुजरातमध्ये बिहारी कामगारांना पिटाळून लावतो याचा काय अर्थ समजावा’ असा प्रश्न जेडीयूकडून विचारण्यात आला आहे.