हिवरा आश्रम (जि. बुलड़ाणा) : 91 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे आयोजित करणे निश्चित झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने आयोजक विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष मानवहितकारी संत शुकदास महाराज यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणारे आरोप केलेत. या आरोपांना विवेकानंद आश्रमाचे मुख्य प्रवक्ते तथा सचिव संतोष गोरे यांनी सोमवारी विवेकानंद आश्रमातच पत्रकार परिषद घेऊन चोख प्रत्युत्तर दिले. शुकदास महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करू नये, असा मनाई हुकूम 2001 मध्ये अकोल्याच्या सहदिवाणी न्यायाधीशांनी बजाविला होता. त्या आदेशाचे उल्लंघन मानव व त्यांचे सहकारी करत असून, हा प्रकार म्हणजे कोर्टाचा अवमान आहे. तसेच, साहित्य संमेलनाच्या तोंडावर निव्वळ चीफ पब्लिसिटी मिळविण्याचा त्यांचा खटाटोप आहे, या शब्दांत गोरे यांनी अंनिसवर टीकास्त्र डागले. या संमेलनाच्यासाठी आवर्जुन या, साहित्यातील रसिकता अनुभवा, असे निमंत्रणही गोरे यांनी मानव यांना दिले.
अंनिसचे आरोप हे न्यायालयीन मनाई हुकूमाचे उल्लंघन!
पत्रकार परिषदेत संतोष गोरे म्हणाले, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना जीवनाचे ध्येय माणून मानवहितकारी संत, कोट्यवधी व्याधीग्रस्तांना अॅलोपॅथीसारख्या अतिउच्च चिकित्सापद्धतीद्वारे व्याधीमुक्त करणारे कुशल धन्वंतरी शुकदास महाराज यांनी जीवन व्यतित केले. त्यांनी कधीही कुणाचे शोषण केले नाही, फसवणूक केली नाही! किंवा धर्माच्या नावाने अंधश्रध्देला खतपाणी घातले नाही. वेदान्त आणि विज्ञान यांची सांगड घालून त्यांनी आरोग्य, दीन-दलित, पीडितांची सेवा, कृषीविकास, शिक्षण, अध्यात्म आणि सेवा या क्षेत्रात डोंगराएवढे काम उभे केले. आजही विवेकानंद आश्रमाच्या रुपाने या क्षेत्रांत संस्थात्मक काम केले जात असून, दरिद्री, पीडित, रोगी, अज्ञ हेच आमचे देव आहेत. या देवाची सेवा करणे हाच महाराजश्रींनी घालून दिलेला आमच्या पुढचा आदर्श आहे. त्याच आदर्शावर पूज्यनीय महाराजश्रींनी वाटचाल केली, आज संस्था त्याच आदर्शावर वाटचाल करत आहे, असा विश्वासही गोरे यांनी व्यक्त केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव व त्यांचे सहकारी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांद्वारे आणि प्रसारमाध्यमांद्वारे पूज्यनीय शुकदास महाराज व विवेकानंद आश्रम या संस्थेवर घाणेरडे आरोप करत आहेत, असे आम्हाला दिसून आले आहे. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची आम्ही स्वतंत्र नोंद घेत आहोत. मानव व त्यांच्या सहकार्यांना आठवण करून देऊ इच्छितो, की सहदिवाणी न्यायाधीश, अकोला यांनी दिनांक 15 डिसेंबर 2001 च्या विवेकानंद आश्रमाच्या याचिकेवरील निकालात (सीआर क्रमांक 154/2002/ सिव्हिल सूट क्रमांक 29/1999) अत्यंत ठळकपणे शुकदास महाराज अथवा विवेकानंद आश्रमाविरोधात कोणत्याही हेतूने, कोणत्याही माध्यमांद्वारे बदनामीकारक वक्तव्ये करू नये, असा मनाई हुकूम जारी केलेला आहे. आता 91 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन विवेकानंद आश्रमात आयोजित करणे प्रस्तावित आहे, त्या पार्श्वभूमीवर ‘निव्वळ स्वस्त प्रसिद्धी’ (चीप पब्लिसिटी) करिता महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवित आहात. हा प्रकार न्यायालयाच्या मनाई हुकुमाचे उल्लंघन आहे. न्यायालयीन अवमाननेची केस कोर्टात दाखल करण्यासाठी आम्ही लवकरच पाऊले उचलणार आहोत, असा खणखणीत इशाराही गोरे यांनी दिला आहे.
अपशकुन केल्यापेक्षा संमेलनाला या : गोरे
संमेलन परिसरात जाहीसभा घेऊन बदनामीची मोहीम चालविणार असल्याचे श्याम मानव यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटद्वारे जाहीर केले होते. त्यावर गोरे म्हणाले, या पत्रपरिषदेद्वारे राज्य सरकार व पोलिस यंत्रणेला सांगू इच्छितो, की श्याम मानव व त्यांच्या सहकार्यांना त्वरित अटकाव घालावा. त्यांना सहदिवाणी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगावे. या उपरही त्यांनी काही अनुचित पाऊले उचलली तर त्याला समाजाच्या सर्वस्तरातून प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याचीही भीती आहे. असे काही दुर्देवी प्रकार श्याम मानव व त्यांच्या सहकार्यांविरोधात घडल्यास त्याची सर्व जबाबदारी अर्थातच पोलिस व श्याम मानव यांची राहील, असा इशाराही गोरे यांनी दिला. श्याम मानव व त्यांच्या सहकार्यांनी नाक खाजवून अशाप्रकारे चांगल्या कार्याला अपशकुन करणे सोडून द्यावे. या साहित्य संमेलनाचे त्यांना निमंत्रण देत आहोत. त्यांनी सारस्वतांच्या या प्रांगणात आणि शुकदास महाराजश्रींच्या तपोभूमीत आवर्जुन यावे, असे आवाहनही गोरे यांनी केले आहे.