तळोदा । महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य हे देवाधर्माच्या विरोधात नाही. देवा-धर्माच्या नावावर होणार्या शोषण व फसवणुकीच्या विरोधात अंनिसचे कार्य असून अंनिसची भूमिका हि व्यापक समाज परिवर्तनाची आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी तळोद्यात केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तळोदा शाखेतील कार्यकर्त्याच्या प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन सत्राच्या वेळी ते बोलत होते.
राज्यघटनेच्या मर्यादेत राहून अंनिसचे कार्य
प्रशिक्षण सत्राला उदघाटक म्हणून समाजकार्य महाविद्यालायचे प्राचार्य प्रा.धंनजय माळी होते. अध्यक्षस्थानी अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ डी बी शेंडे, यावेळी विचार मंचावर,जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रा डॉ प्रशांत बोबळे,बुधावलीचे सरपंच सुरेश पाटील,आर.डी. साळवे,सुभाष भूजबल,जिल्हा सचिव खंडू घोडे,राजेश गुलाले,आदी उपस्थीत होते. सावळे पुढे म्हणाले की,भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या धर्म व उपासना स्वातंत्र्याचा अंनिस आदर करते.भारतीय संविधानाच्या मर्यादेत राहूनच अंनिस आपले कार्य करते.अंनिस समाजात वैज्ञाणिक दृष्टीकोनचा प्रचार व प्रसार करून समाज विवेकी बनविण्याचा प्रयत्न करते.शिबिराला तळोदा तालुक्यातील सुमारे 40हुन अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.शिबिराच्या यशस्वीतेसाठी तळोदा शाखा सचिव प्रा कमलेश बेडसे,मुकेश कापुरे,प्रा राजू यशोद,अमोल पिंपळे,फुंदीलाल माळी,विजय भामरे,एस आर मुके,आदींनी कामकाज पाहिले.