मुंबई । अंबेडकरी जनतेच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रगतिसाठी व पुढील वाटचालीसाठी आज झालेल्या बैठकीत रिपब्लिकन ऐक्य ही काळाची गरज असल्याच्या मतावर सहमती होऊन त्यासाठी 11 जनांच्या समिती ची स्थापना करण्यात आली. रिपब्लिकन ऐक्य केवळ बौद्धांचे ऐक्य ठरत असल्याने या चळवळीत बौद्धेतरांनीही यावे तर रिपब्लिकन ची राजकीय ताकद वाढेल त्यासाठी रिपाइं ऐक्याचे अध्यक्षपद बौद्धेतर समाजाच्या नेतृत्वास द्यावे अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. रिपाइं ऐक्यासाठी आपला गट बर्खास्त करण्यासही आपण तयार असल्याचे आठवलेंनी स्पष्ट केले.
साहित्यीक, विचारवंत आणि पत्रकारांची उपस्थिती
मुंबई विद्यापीठाच्या कालीना कॅम्पस येथील जे. पी. नायक भवन येथे अंबेडकरी विचारवंतांच्या बैठकीत झालेल्या विचारमंथनात आठवले बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ गंगाधर पानतावने उपस्थित होते तसेच या बैठकीस अंबेडकरी चळवळी चे अनेक प्राध्यापक पत्रकार संपादक विचारवंत उपस्थित होते. रिपाइं ऐक्यासाठी 11 जनांच्या निमंत्रक समिति मध्ये ज्येष्ठ पत्रकार संपादक बबन कांबळे, सुनील खोबरागडे, वैभव छाया, प्रा विजय खरे, डॉ संगीता पवार, अशोक कांबळे, डॉ बी बी मेश्राम, मंगेश बनसोड, डॉ जी के डोंगरगावकर, प्रा जी. पि. जोगदंड यांचा समावेश आहे. या बैठकीस अविनाश महातेकर, तानसेन ननावरेे काकासाहेब खंबाळकर, चन्दन गोटे, प्रा शहाजी कांबळे, अच्युत माने, गौतम सोनवने, चंद्रशेखर कांबळे, हेमंत रणपिसे, श्यामल गरुड़, डॉ सन्देश वाघ, डॉ. विजय मोरे आदि अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस दिवंगत अंबेडकरी साहित्यिक वामन होवाळ डॉ. कृष्णा किरवले, प्रा. रामनाथ चव्हाण, भास्कर आबाजी कांबळे यांना आदरांजली वाहिली.
ऐक्य कायम टिकावे यासाठी नियमावली बनवावी
या बैठकीत अंबेडकरी समाजाच्या गती अधोगती वर साधक बाधक चर्चा झाली. सामाजिक स्तरावर अंबेडकरी जनता एकजुट आहे पूर्णा सारखी घटना घडली तर जनता एकत्र येते मात्र राजकीय ऐक्य नसल्याने निवडणुकांत अपयश येत आहे . अनेकदा रिपाइं ऐक्य झाले मात्र ते टिकले नाही, त्यामुळे आता रिपाइं ऐक्य कायम स्वरूपी टिकणारे ऐक्य झाले पाहिजे त्यासाठी नियमावली बनविली पाहिजे. त्याची अंमलबजावणी लोकांनीच केली पाहिजे. रिपब्लिकन ऐक्य केवळ बौद्धांचेच होऊ नये तर सर्व समाजाचे लोक यात यावेत, अन्य समाजाने रिपाइं मध्ये यावे यासाठी बौद्धेतरांस रिपब्लिकन ऐक्याचे अध्यक्षपद द्यावे, अशी सूचना रामदास आठवले यांनी मांडली.
दलित आदिवासी आणि मुस्लिमांची एकजुट उभारावी
महाराष्ट्रात बौध्दांची संख्या 65 लाख तर हिन्दू महार म्हणून नोंद केलेली 80 लाख आणि मातंग समाजाची लोकसंख्या 24 लाख आहे . राज्यात दलित आदिवासी आणि मुस्लिमांची एकजुट उभारून राजकीय ताकद अभी करावी अशी ही सूचना या बैठकीत विचारवंतांनी मांडली. याबाबत आणखी बैठक घेऊन विचारमंथन करीत राहण्याचे यावेळी ठरविण्यात आले आहे.