अक्कलकुवा येथे शिवभोजन केंद्र सुरू !

0

अक्कलकुवा। गरजू जनतेला माफक दरात जेवण मिळावे या हेतूने महाविकास आघाडी सरकारने राज्यात शिवभोजन योजना कार्यान्वित करुन तालुका स्तरावर शिवभोजन केंद्रांची निर्मिती केली आहे. त्याच धर्तीवर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा गावात जय हनुमान शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्था कोयलीविहिर यांना शिवभोजन केंद्राला मान्यता मिळाली असून २ एप्रिलपासून शिवभोजन केंद्राला सुरुवात झाली आहे. लॉकडाउनच्या काळात जेवण अवघ्या पाच रुपयात उपलब्ध होणार आहे. कोरोना विषाणूच्या खबरदारीने अवघा देश लॉकडाउन असल्यामूळे गरजू जनतेला जेवणाची सोय व्हावी म्हणून राज्याचे अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगनराव भुजबळ साहेब यांच्या विभागामार्फत ही योजना तालुकास्तरावर कार्यान्वित करण्यात आली. योजनेचा शुभारंभ जिल्हा शिवसेना कार्यालय अक्कलकुवा येथे तहसीलदार विजय कचवे, जिल्हा शिवसेना प्रमुख आमश्या पाडवी, शिवभोजनचे संचालक इम्रान पठाण, नंदलाल चौधरी, माजी पंचायत समिती सभापती सुरेशचंद जैन, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले, तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष रविंद्र गुरव तसेच तालुकाध्यक्ष कमलेश शिंदे, शिवभोजनचे लाभार्थी उपस्थित होते.