अखेर कर्नाटकातील 15 आमदारांचा भाजपात प्रवेश

0

बंगळूरू : कर्नाटकातील सत्ता संघर्ष संपूर्ण देशाला ठाऊक आहे. सुरुवातील कर्नाटकात कॉंग्रेस-जेडीएसने सत्ता स्थापन केले मात्र नंतर भाजपने कॉंग्रेस, जेडीएस काही आमदार फोडून सरकार स्थापन केले. हे प्रकरण कोर्टात गेले होते, आता 17 बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. या आमदारांना पोटनिवडणूक लढता येणार आहे. मात्र, तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी त्यांना अपात्र ठरविलेला निर्णय योग्य असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. यानंतर आज गुरुवारी 14 रोजी या 17 बंडखोर आमदारांपैकी 15 आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. कर्नाटकमधील पक्ष मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात 15 आमदारांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि प्रदेश अध्यक्ष नलिन कुमार कटील यांच्या उपस्थित 15 आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. कर्नाटकमधील 15 विधानसभा मतदारसंघात 5 डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणूक भाजपा या आमदारांना तिकीट देऊ शकतं. विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजपाला या पोटनिवडणुकीत किमान सहा ते सात जागांवर विजय मिळवावा लागणार आहे. मात्र या निवडणुकीत पराभव झाल्यास भाजपाला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही.

तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी 17 आमदारांना अपात्र ठरविले होते. या कारवाईविरोधात 17 आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टात न्या. एन.व्ही. रमण, न्या. संजीव खन्ना आणि न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठासमोर पूर्ण झाली होती. या सुनावणीचा निकाल आज लागला असून सुप्रीम कोर्टाने तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी 17 आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले आहे. मात्र, आमदारांना विधानसभेची मुदत संपेपर्यंत अपात्र ठरवता येणार नाही, असे सांगत त्यांना पोटनिवडणूक लढण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आहे.