अखेर मातोश्रीने घेतली ‘त्या’ शेतकऱ्याची दखल; समस्या सोडविण्याचे आदेश !

0

मुंबई: कर्जबाजारी शेतकऱ्याने आज रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री गाठले. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी शेतकऱ्याला आत प्रवेश दिला नाही. काही काळ गोंधळ झाल्याने पोलिसांनी शेतकऱ्याला आणि त्याच्या लहान मुलीला ताब्यात घेतले. ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळल्यानंतर त्यांनी लागलीच पोलिसांना त्यांची सुटका करण्याचे आदेश देत समस्या सोडविण्याबाबत यंत्रणेला सूचना केल्या.

देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पनवेलवरून वांद्रे येथील मातोश्री येथे आले होते. त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलगीही होती. काही काळ मातोश्रीबाहेर ते ठाण मांडून बसले होते. काहीच होत नाही असे लक्षात आल्यानंतर त्यांनी मातोश्रीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांना कर्ज आणि शेती संदर्भातील गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांकडे मांडायचे होते. पण, सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले आणि ताब्यात घेतले. पोलीस स्थानकात नेण्यासाठी व्हॅनमध्ये बसवताना शेतकरी आणि पोलिसांची चांगलीच बाचाबाची झाली. शेतकरी सातत्याने म्हणत होता की, मला घरी जाऊद्या पण पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना खेरवाडी पोलीस स्थानकात नेले.