अखेर शिरसाई योजना कार्यान्वित

0

बारामती । गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली शिरसाई उपसा सिंचन योजना अखेर कार्यान्वित झाली. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण निर्मान झाले आहे. बारामती तालुक्यातील जिरायत भागास वरदान असलेली ही योजना रविवारी सकाळी कार्यन्वित करण्यात आली.

थकित वीजबीलामुळे अडचणी
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून 2000-2001 मध्ये कोट्यवधी रुपये खर्चुन शिरसाई उपसा सिंचन योजना सुरु करण्यात आली होती. ही योजना ब्रिटीश कालीन शिर्सुफळ तलावावर राबविण्यात आली होती. यंदा मात्र, थकित वीजबिलाच्या प्रश्‍नामुळे योजना कार्यान्वित करण्यात अडचण येत होती. याच पार्श्‍वभूमीवर योजना सुरू होणार की नाही याबाबत प्रश्‍नचिन्ह होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा या दोघांनीही संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांस बैठका घेऊन योजना कार्यान्वित करण्याबाबत मागणी केली होती. मात्र थकित पाणीपट्टी व विजबिलाचा प्रश्‍न तसेच प्रलंबित होता. यावर संबंधित भागातील शेतकर्‍यांनीच पुढाकार घेत पैसे एकत्र करीत जमा केले. यामुळे ही योजना सुरु करण्यास अखेर आज मुहूर्त मिळाला आहे.

पाणीपट्टी भरणे गरजेचे
योजनेबाबत मागणीनुसार 15 दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये डावा व उजवा या कालव्यांच्या माध्यमातून वसुलीच्या प्रमाणात पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसिंचनाच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. यामुळे डाव्या कालव्यांवरील जराडवाडी, उंडवडी कडेपठार, गोजुबावी, बर्‍हाणपुर, तर उजव्या कालव्यावरील उंडवडी सुपे, साबळेवाडी, कारखेल, खराडेवाडी, सोनाली सुपे, जळगाव, अंजनगाव या गावांना लाभ होणार आहे. मात्र वसुलीनुसारच पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे लाभार्थी गावांमधील शेतकर्‍यांनी पाणीपट्टी भरणे गरजेचे असल्याचे शिरसाई उपसा सिंचन योजनेचे शाखा अभियंता एल. जी. भोंग म्हणाले.

75 लाख थकबाकी
शिरसाई उपसा सिंचन योजनेची जवळपास 75 लाख रुपये थकबाकी आहे. यामध्ये सध्याच्या आवर्तनात 50 टक्के वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. योजना अवलंबुन असलेल्या शिर्सुफळ तलावामध्ये सध्या 326 दशलक्ष घनफुट पाणीसाठा आहे. यापैकी 306 दशलक्ष घनफुट पाणीसाठा वापरण्यायोग्य तर 20.58 दशलक्ष घनफुट पाणीसाठा मृतसाठा आहे. यामध्ये 200 दशलक्ष घनफुट पाणी उपसाचे नियोजन करण्यात आले आहे.
– एल. जी. भोंग, शाखा अभियंता,
शिरसाई उपसा सिंचन योजना