दिल्ली:- कोरोना विषाणूचा फटका शैक्षणिक क्षेत्राला बसला आहे. अनेक राज्यांनी परीक्षा न घेता सरसकट विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच शालेय परीक्षांबरोबरच सीबीएसई बोर्डाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आयसीएसई बोर्डानेही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली.
१ ते १५ जुलै दरम्यान घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना मागील तीन वर्गात मिळालेल्या गुणांचं मूल्यमापन करून मूल्यमापन केलं जाणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचं मंडळानं दिलेल्या गुणांवर समाधान होणार नाही, त्यांनी नंतर बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा देऊ शकतात. सीबीएसईबरोबरच आयसीएसई बोर्डानेही दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. मात्र, बोर्डानं दिलेल्या गुणांवर समाधान न झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास बोर्डानं नकार दिला आहे.
दिल्ली, महाराष्ट्र व तामिळनाडू या राज्यांनी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात असमर्थता दर्शविली होती, असं तुषार मेहता यांनी सांगितलं. त्यावर सीबीएसईनं बारावीच्या परीक्षेसंदर्भात नव्यानं सूचना जारी करावी, तसेच राज्य मंडळांच्या परीक्षांच्या स्थितीसंदर्भातही उत्तर दाखल करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.