सोनिया गांधी यांची मोदी सरकारवर बोचरी टीका
नवी दिल्ली : भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणार्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर हल्ला चढवला. ’अच्छे दिन’ची अवस्थाही ’इंडिया शायनिंग’सारखी होईल, असे त्या म्हणाल्या. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. नरेंद्र मोदींबाबत विचारले असता, मी मोदींना व्यक्तिगतरित्या ओळखत नाही. पंतप्रधान म्हणून संसदेत अथवा देश-विदेशातील विविध कार्यक्रमांतून त्यांना पाहिले आहे, असे सोनियांनी सांगितले.
लोकशाही मूल्यांवर हल्ला होत आहे!
भाजप सरकारवर हल्ला करताना सोनिया गांधी म्हणाल्या, की ’भारतात 26 मे 2014 पूर्वी विकास झालाच नाही का? तो केवळ गेल्या चार वर्षांत झालाय का? हा आपल्या देशातील नागरिकांचा अपमान नाही का? लोकशाहीत खुलेपणाने चर्चा करण्याची सूट असली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत काही लोक खूप मागे जात आहेत. इतिहास पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाचे राजकारण एका वेगळ्या दिशेने जात आहे. लोकशाही मूल्यांवर हल्ला केला जात आहे. सत्तेत बसलेले लोक चिथावणी देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील संकट वाढले असून, विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणुकांसाठी लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असून, माहिती अधिकार कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे, असे आरोपही त्यांनी केले. देशात रोजगाराची समस्या गंभीर झाली आहे. शेतकर्यांची परिस्थिती वाईट आहे. या मुद्द्यांवर आवाज उठवणार्या राजकीय पक्षांवर तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही सोनियांनी सांगितले.
2019 मध्ये ’हा’ मुद्दा अजेंड्यावर..
भाजपने गेल्या चार वर्षांत दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. हाच मुद्दा 2019च्या निवडणुकीत अजेंड्यावर असेल. भाजपने दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. भाजपच्या ’अच्छे दिन’ची गत पुन्हा एकदा ’शायनिंग इंडिया’सारखी होईल, असा विश्वास आहे, असेही त्या म्हणाल्या. संसदेत विरोधकांना बोलू दिले जात नाही. अनेक मुद्द्यांवर चर्चाही करता येत नाही. सरकार चर्चेपासून दूर का पळते, हेच समजत नाही, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची स्तुती केली. वाजपेयींच्या विचारांशी काँग्रेस पक्ष सहमत नसला तरी, वाजपेयी सरकारच्या काळात संसदीय परंपरांचा सन्मान केला जात असे. याबाबतीत मोदी सरकार खूपच मागे पडले, असा टोलाही सोनियांनी हाणला.