मुंबई- लोकपाल नियुक्तीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी आठवडाभर राळेगणसिद्धीत उपोषण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त नियुक्तीबाबत अण्णांना ठोस आश्वासन दिल्याने त्यांचे उपोषण सुटले. दरम्यान, लोकपालचा शोधही आता सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीच्या अध्यक्षाची नेमणूक करण्यात आली आहे. न्या. रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली लोकपालची नियुक्ती होणार आहे. लोकपाल अध्यक्ष आणि सदस्यांसाठी जाहीरातही देण्यात आली असून अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी आहे. ही जाहीरात गेल्या महिन्यात आठ सदस्यांच्या लोकपाल निवड समितीच्या बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पात्रतेचे निकष
सुप्रीम कोर्टाचे विद्यमान अथवा सेवानिवृत्त सरन्यायाधीश, न्यायाधीश, भ्रष्टाचारविरोधी नीती, लोकप्रशासन, सतर्कता, अर्थ आणि कायदा मंत्रालयात काम केलेल्या कमीत कमी २५ वर्षांचे निष्कलंक कारकीर्द असलेली कोणतीही व्यक्ती लोकपाल पदावर बसण्यास योग्य आहे. मात्र, लोकपालपदासाठी निवडूण आलेला लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायिक, कोणत्याही ट्रस्टचा सदस्य किंवा लाभाच्या पदावर असलेली व्यक्ती पात्र होत नाही. लोकपालचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असणार आहे. त्याचे वेतन हे भारताच्या सरन्यायाधीशांइतके असेल. अध्यक्ष बनल्यानंतर त्या व्यक्तीला सरकारच्या कोणत्याही प्रकारच्या पदावर (राजकीयपदासह) प्राप्त करण्याची परवानगी नसेल तसेच सरकारमध्ये ती कोणत्याही लाभाच्या पद घेता येणार नाही. तसेच लोकपालपद सोडल्यानंतर संबंधीत व्यक्तीला पाच वर्षांसाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुक लढवण्यास बंदी असेल. या पदासाठी कमीत कमी वयोमर्यादा ४५ वर्षे असेल.