अण्णा हजारे यांच्याविषयी काही बोलणे मी सोडून दिलं आहे – शरद पवार

0

पुणे : अण्णा हजारे यांच्या उपोषण या विषयावर बोलणे आणि बातम्या वाचणे मी गेली दोन वर्षे सोडून दिलं आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे बैठक पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

शरद पवार यांनी मोदींसहित अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. संसदेत आजवर लोकसभेच्या अखेरच्या सत्रातील अनेक पंतप्रधानांचे भाषणे पाहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदेतील गुरुवारचे भाषण वाचनात आले. त्यांचे भाषण प्रथेला धरून नव्हते. त्यांच्यावर जसे संस्कार झाले, त्यानुसारच ते बोलले आहेत,अशा शब्दात शरद पवार यांनी मोदींवर टीका केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील, अशी शक्यता व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, लोकसभेसोबत विधानसभा एकत्र झाली. तर महाराष्ट्रातील जनतेची सात महिने अगोदर सुटका होईल, अशा शब्दात त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

शिरुर आणि मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराबाबत शरद पवार म्हणाले की, शिरूरमधून अजित पवार यांनी लढायची आवश्यकता नाही. माझ्याकडे सहा प्रबळ दावेदार असल्याचे पवार यांनी सांगितले. माढा लोकसभा मतदारसंघातून तुम्ही लढणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर ते म्हणाले की, माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी विजय सिंह मोहिते पाटील यांनी केली आहे. मात्र माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही. पण या बाबत विचार करून सांगू, असे त्यांना मी सांगितले, असेही पवार यांनी म्हटले आहे.