अतिवृष्टीत आवश्यक खबरदारी घेण्याचे प्रशासनाला निर्देश

0
मुंबईत 150 अतिरिक्त पाणी उपसा पंप बसविले
तर महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देणार
मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती
निलेश झालटे,नागपूर : मुंबई व कोकण भागात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासन यंत्रणा सजग आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. मुंबई मध्ये पाणी उपसा करण्यासाठी 150 अतिरीक्त ड्रेनेज पंप लावण्यात आले आहे. त्याचबरोबर अकरावी व बारावीच्या प्रवेशासाठीच्या प्रक्रियेला देखील गरज पडल्यास मुदतवाढ देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. सोबतच परिस्थिती पाहून शाळा बंद ठेवण्याचे तसेच गरज पडल्यास सध्या सुरू असलेली महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात येतील, असे निर्देशही त्यांनी दिले.
या आपत्तीत राजकारण नको
यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य अजित पवार, आशिष शेलार यांनी मुद्दा उपस्थित केला होता. विखे पाटील यांनी यावेळी पावसामुळे स्थिती गंभीर झाली असून लोक हवालदिल झाली आहेत असे सांगत अशा वेळी शासन व्यवस्था बंद असल्याचे सांगितले. लोक वाऱ्यावर आहेत. याविषयात मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप करावा. आणि शासनाने तातडीने पाऊल उचलावे अशी मागणी केली.  यावर अजित पवार यांनी अशा नैसर्गिक संकटांनी मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला आहे. मुंबईत अनेक दुर्घटना घडता आहेत. यामुळे महापालिका कुणाची, सरकार कुणाचं असा वाद न करता सरकार म्हणून उपाययोजना व्हाव्या, अशी सूचना केली. तसेच या आपत्तीत मंत्रालायत काही अधिकारी चांगले काम करतात, त्यांना सोबत घ्यावे अशी विनंती केली. पवार यांनी या प्रकरणी राजकारण न करता पाऊले उचला आम्ही देखील सहकार्य करू असे सांगितले.
तर प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ
त्याला उत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई व कोकण भगत सातत्याने अतिवृष्टी होत आहे. पालघर जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडत आहे. जिल्हा प्रशासन अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मुंबईत अतिवृष्टीमुळे 11 ठिकाणी पाणी तुंबले असून तीन ठिकाणी रस्ते वाहतूक वळविण्यात आली आहे. वसई विरार दरम्यान रेल्वे वाहतूक बंद असून अन्यत्र मात्र लोकल सेवा सुरू आहे. रस्ता वाहयुक धिम्या गतीने सुरू आहेत. पावसाचे पाणी उपसा पूर्ण क्षमतेने होत असून 150 अतिरिक्त पंप लावण्यात आले आहेत. भरती काळात अधिक सजग राहण्यास प्रशासनास सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी आढावा घ्यावा. गरज पडल्यास अकरावी व बारावीच्या प्रवेशप्रक्रियेस मुदतवाढ देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.