मुंबई: बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांना फेसबुकवरुन धमकी देण्यात आलेल्या प्रकरणावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन सुरु असताना गावगुंडांमध्ये फेसबुक लाइव्ह करुन धमकी देण्याची हिंमत असेल तर या विधानसभेचा अर्थ उरणार नाही अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी श्रीरामपूरमध्ये अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्याने संताप व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला.
‘बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना फेसबुक लाईव्हवरुन धमकी देण्यात आली आहे. मुंबई बाबा नावाच्या गुंडाने सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचा उल्लेख करत आणि त्याच्या केसाला धक्का लागला तर राजेंद्र राऊत यांचे हात पाय मोडून टाकू अशी धमकी दिली आहे. पुढे तो म्हणतोय की, राजेंद्र राऊत तुम्ही संरक्षण घेतलं असलं तरी पोलिसांमध्ये आमचे लोक आहेत. गावगुंड अधिवेशन सुरु असताना फेसबुक लाईव्ह करुन धमकी देण्याची हिंमत दाखवत असेल तर या विधानसभेचा अर्थ उरणार नाही. मुंबईत असा कोणता बाबा तयार झाला आहे जो स्वत:ला एवढा मोठा गुंड समजतो. आजच्या आज त्याला अटक झाली पाहिजे अशी मागणी फडणवीस यांनी केली.